अकोले: अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरणात काल रविवारी (दि. २६) सायंकाळी तांत्रिकदृष्ट्या भरले असले तरी जलाशय परिचलन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी १० हजार ३८९, (९५ टक्के) दलघफूटावर पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यात आला आहे.
भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने १३ हजार ४० क्यूसेक्स पाणी निळवंडे जलाशयात पडत असल्याने निळवंडे धरणही तांत्रिक दृष्ट्या भरल्याने निळवंडे धरणातून ८ हजार ५०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे.
गत आठवडाभरापासून भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस पडत असला तरी काल रविवारी सकाळी पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले होते, परंतु दुपारी घाटघर, साम्रद, रतनवाडी, उडदावणे, पांजरे परिसरात पावसाने रौद्र रूप धारण केल्यामुळे भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.
भंडारदरा धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातून स्पिलवे गुट मधून १२ हजार २१० क्यूसेकने, विद्युतगृहाच्या टनेल मधून ८३० क्यूसेकने असे १३ हजार ४० क्यूसेकचा विसर्ग सोडण्यास आला आहे. तर निळवंडे धरणातून ७८०० क्युसेकने व विद्युत गृहातून ७०० असे एकुण ८ हजार ५०० क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदी दुधडी भरून वाहत आहे.
गेल्या २४ तासात प्रवरा पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस :
भंडारदरा : ११० मि.मी., घाटघर ११५ मि.मी., पांजरे ८१, रतनवाडी ११४, वाकी १०२, तर निळंवडे: २५ मि.मी. पावसाची नोंद झाली.
२० दिवसांत मुळा धरणात साडेआठ टीएमसीची भर
जिल्ह्यातील सर्वाधिक जलसाठा क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या २० दिवसांत लक्षणीय वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात तब्बल साडेआठ टीएमसी पाण्याची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे धरणाचा उपयुक्त जलसाठा आता ५८ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी खरीप, रब्बी हंगामासह पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीनेही दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
रविवारी सायंकाळपर्यंत मुळातील पाणीसाठा १५ टीएमसीपर्यंत पोहोचला असून पाणीपातळी १,७९० फूट नोंदविण्यात आली. अवघ्या २० दिवसांत धरणाच्या पाणीपातळीत तब्बल २८ फूट वाढ झाल्याने जलसंपदा विभागालाही मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या धरणातील साठा सातत्याने वाढत असून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास आगामी काही दिवसांत जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थितीनुसार आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी विभाग सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जायकवाडीत ४१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा
गेल्या चार पाच दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पा अस सुरु आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे धरण भरल्यात जमा आहे. आढळा ओव्हर फ्लो झाले. मात्र मुळा धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टीएमसी पाणी कमी आहे. एकंदरीत जिल्ह्यातील पाणीसाठा ६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, गोदावरी, प्रवरा नद्या दुथडी वाहत असल्यामुळे पाच दिवसांत जायकवाडी धरणात १५ टीएमसी पाणी पोहोचले. त्यामुळे या धरणातील उपयुक्त पाणीसाठा ४१ टीएमसीवर पोहोचला आहे.
जून महिना जवळपास कोरडाच गेला आहे. जुलै महिन्यात पहिल्या आणि तिसर्या आठवड्यात पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रात सर्वदूर पाऊस झाला. त्यामुळे नद्या वाहत्या झाल्या असून, भंडारदरा, निळवंडे धरणे ओव्हर फ्लो झाल्यात जमा आहे. गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यंदा भंडारदरा व निळवंडे धरणांत अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.
गेल्या चार पाच दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात अधिक पाऊस झाला. त्यामुळे तेथील काही धरणे ओव्हर फ्लो झाली. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी वाहू लागली. गोदावरी आणि प्रवरा वाहत्या नद्यांमुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. १ जुलै रोजी जायकवाडी धरणात २१.४२ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा होता. २० जुलैपर्यंत २५ टीएमसीची नोंद होती. २६ जुलैपर्यंत या धरणातील जिवंत पाणीसाठा ४१ टीएमसी एतका नोंदविला गेला आहे. त्यामुळे मराठवाड्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. जायकवाडी धरणाची क्षमता १०२.७३ टीएमसी इतकी असून, जिवंत पाणीसाठा ७६.६७ टीएमसी आहे. आजमितीस या धरणात ४१टीएमसी जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. समन्यायी पाणी वाटपातून वाचण्यासाठी जिवंत पाणीसाठ्यापैकी ६५ टक्के म्हणजे जायकवाडीत ५० टीएमसी जिवंत पाणीसाठा आवश्यक आहे. नाशिकला एक दोन पाऊस झाल्यास नगरकरांना जायकवाडीत पाणी सोडण्याची गरज भासणार नाही.