नगर: शहरातील कापड बाजारात रस्त्यावर दुकाने मांडल्याने रहदारीस अडथळा निर्माण होतात होता. त्यामुळे बुधवारी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत मोची गल्ली, घास गल्ली, कापड बाजार परिसरातील अतिक्रमणे हटविली.
शहरातील कापड बाजार परिसरात रस्त्यावर दुकाने थाटल्याने मुख्य व्यावसायिक व खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना रहदारीस मोठी अडचण निर्माण होत होती. त्यातून अनेक वेळा वादही निर्माण झाले होते. त्यामुळे महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक व वाहतूक शाखेच्या पोलिस पथकाने बुधवारी संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सर्व अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक व वाहतूक शाखेच्या पोलिस पथकाने संयुक्तपणे कारवाई करीत मोची गल्ली, घासगल्ली, भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौकापर्यंत रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली.
रस्त्यावरील टपऱ्या, दुकानदारांचे स्टँड, रस्त्यावर लटकवलेल्या वस्तू मनपाच्या पथकाने जप्त केल्या. 20 दुकानांवर कारवाई करीत तीन हातगाड्या, पाच टेबल, तीन जाहिरात फलक, पाच स्टूल, तीन खुर्ची, पाच लोखंडी स्टॉल जप्त करण्यात आली. ही मोहीम आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे पथकाने सांगितले. ही कारवाई पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, उपनिरीक्षक श्यामुवेल गायकवाड, उपनिरीक्षक मन्सुर सय्यद, सहायक फौजदार रामराव शिरसाठ व मनपाच्या इंजिनिअर अदित्य बल्लाळ, नितीन इंगळे यांच्या पथकाने केली.
कारवाईत सातत्य राहावे
महापालिका व वाहतूक पोलिसांनी केलेेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे अनेकांनी स्वागत केले. मात्र, अतिक्रमण हटाव कारवाईमध्ये सातत्य राहावे. जेणे करून पुन्हा रस्त्यावर कोणी येणार नाही, रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही अशी भावना अनेकांनी व्यक्त केल्या.