नगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आजपासून गावच्या तलाठी, ग्रामपंचायत कार्यालयासह बँकेतही पहायला मिळणार आहे. दरम्यान, कर्जमाफीची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना अग्रीस्टॅक फार्मर आयडी क्रमांक अनिवार्य असून, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आपले सरकार केंद्र केंद्रावर जाऊन अग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
या संदर्भात जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे की, जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीची यादी प्राप्त झाली आहे. त्यातील पात्र शेतकऱ्यांनी सोसायटीमध्ये, संबंधित बँकेमध्ये जाऊन ही यादी पहावी. आपल्या कर्ज खात्याची रक्कम व कर्ज खाते क्रमांक खात्री करावी.
तसेच आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज खात्याचे पुस्तक अथवा कर्ज खात्याचे तपशील सोबत ठेवावे. आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया ही विनामुल्य असून कोणत्याही केंद्रावर पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरणासाठी कोणतीही रक्कम अदा करु नये, असे आवाहन सुरवसे यांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या यादीचे वेध लागले होते. यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना फक्त पन्नास हजारांची कर्जमाफी मिळणार होती. यामुळे अनेक शेतकरी वंचित राहणार असल्याने, काही संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. विरोधकांसह सत्ताधारी लोकप्रतिनिधींनीही आपल्या सरकारकडे फेरविचार करण्याची मागणी केली होती.
त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत, यापूर्वी कर्जमाफी मिळाली असली तरी दोन लाखापर्यंतचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार असल्याचा विश्वास वाढला होता. मात्र यादीची प्रतीक्षा कायम होती. आता ती देखील पूर्ण झाली असून, आजपासून ही यादी गावात पहायला मिळणार आहे. साधारणतः दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे यादीत असणार आहे.