नगर: जिल्ह्यात 10 लाख 55 हजार कुटुंबांचा समावेश असून, यामधील 41 लाख 65 हजार लाभार्थी आयुष्यमान कार्डसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 18 लाख 23 हजार आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले आहेत.
उर्वरित पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्मान कार्ड काढावेत यासाठी 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेत नागरिकांनी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले आहे. (Latest Ahilyanagar News)
जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनांमुळे लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असून, 1 हजार 356 प्रकारच्या शस्त्रक्रिया व विशेष उपचारांचा समावेश आहे. कुटुंबातील 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत वय वंदना कार्डच्या माध्यमातून अतिरिक्त 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्याकडे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड स्वतः लाभार्थी, आशा स्वयंसेविका, आपले सरकार सेवा केंद्र तसेच स्वस्त धान्य दुकानदार (राशन दुकानदार) यांच्यामार्फत सहज उपलब्ध आहे. तसेच गूगल प्ले स्टोअरवरून आयुष्मान अॅप डाउनलोड करूनही सुविधा मिळू शकते.
लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत 31 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व सरपंच यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, आयुष्यमान कार्डच्या दैनंदिन प्रगतीवर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी केल्या आहेत.
आधार कार्ड, रेशनकार्ड क्रमांक आवश्यक लाभार्थ्यांनी कार्ड तयार करण्यासाठी
https://beneficiary.nha.gov.in/(https://beneficiary.nha.gov.in या पोर्टलवर भेट द्यावी किंवा गूगल प्ले स्टोअरवरून आयुष्मान अॅप डाउनलोड करून आवश्यक माहिती भरावी. आधार क्रमांक, राशन कार्ड व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक यांच्या आधारे ओटीपी टाकून नोंदणी करता येते. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची माहिती भरून, छायाचित्रासह अर्ज सादर करून कार्ड डाउनलोड करता येते. या प्रक्रियेसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड व लाभार्थ्याचा जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे