नगर: महापालिकेने हाती घेतलेल्या डेंग्युमुक्त अभियानांतर्गत अहिल्यानगर शहरातील 12 हजार घरांना भेटी देत 36 हजार पाणी साठे तपासण्यात आले. यातील 570 पाणीसाठे दुषित आढळून आल्याने ते तत्काळ नष्ट करण्यात आले.
महापालिकेने सुरू केलेल्या डेंग्यु मुक्त अभियानांतून जनजागृती झाल्याने यंदा केवळ 8 रुग्ण आढळून आले असून मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. गतवर्षी 78 तर त्यापूर्वीच्या वर्षी 98 रुग्णांना डेंग्युची लागण झाली होती. महापालिकेच्या अभियानामुळे यंदा डेंग्यु रुग्ण घट झाल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासन यशवंत डांगे यांनी सांगितले. (Latest Ahilyanagar News)
चिकनगुनिया, हिवताप, डेंगू आणि मलेरिया हे आजार डासांमुळे होतात. डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यू आजार होतो आणि तो स्वच्छ पाण्यात होतो. नागरिकांनी घरात साठवलेले पाणी वेळोवेळी नष्ट करावे आणि आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहन डांगे यांनी केले.
शनिवारी सारसनगर परिसरातील अभियानात आयुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, हभप प्रभाताई भोंग, शिवाजी विधाते, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, शिवाजी म्हस्के, जगन्नाथ बोडखे, डॉ. राहुल मुथा, डॉ. संदीप राऊत, डॉ. आयेशा शेख सहभागी झाले.
कुमारी तनिष्का चंदेवय 6 वर्षीय बालिकेने डासाची वेशभूषा करून आरोग्यास हानिकारक असल्याबाबत सांगितले. कुमारी अस्मिता इंगळेने गणपतीच्या आरतीमध्ये संसर्गजन्य आजारांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती केली. सूत्रसंचालन डॉ. आयेशा शेख यांनी केले तर डॉ. सतीश राजुरकर यांनी आभार मानले.
शंभर कर्मचार्यांची यीस पथके
डेंग्यू मुक्त अभियानात 100 कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येकी पाच जणांचे वीस पथक कार्यरत असून ते घरोघरी जावून पाणी साठ्यांची तपासणी करत आहेत. दूषित पाणीसाठे आढळल्यास नष्ट केले जात आहे. अभियानाचा अकरावा आठवडा असून 12 हजार घरांतील 36 हजार पाणी साठ्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील 570 दूषित पाणीसाठे आढळून नष्ट केले गेले.