Ganeshotsav 2025: तीन हजार सार्वजनिक मंडळ, 221 गावांत एक गाव, एक गणपती
नगर: गणेशोत्स्व काळात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्ह्यातील 3 हजार सार्वजनिक मंडळांकडून श्रींची प्रतिष्ठापना तसेच 221 गावात एक गाव गणपती’ उपक्रम राबविला जाणार आहे. सोशल मिडियावर वॉच ठेवण्याकरीता स्वतंत्र पोलिस पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी माध्यमांना दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराळे यांनी नगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे, पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)
गणेशोत्सव काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी समाजकंटकांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येणार आहे. गणेशोत्सवा दरम्यान तीन हजार पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. गणेशोत्सवात पोलिस अधिकारी, कर्मचार्यांच्या रजा बंद करण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात सुमारे 500 समाजकंटकांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई केली जाणार आहे.
मंडळाच्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सूचित करण्यात आले आहे. गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे की नाही, याची पाहणी केली जाणार आहे. सोशल मीडियावरही पोलिसांचा वॉच राहणार असून त्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी. विनाकारण कोणत्याही पोस्ट करू नयेत, असे कराळे यांनी सांगितले.
महापालिका, महावितरणला सूचना
महापालिका आणि महावितरण कंपनीच्या अधिकार्यांची बैठक घेवून सूचना करण्यात आलेल्या आहेत. अहिल्यानगर शहरात रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. त्याबाबत तातडीने उपाय योजना करण्याचे महापालिका प्रशासनाला सूचित करण्यात आले आहे. शहरातील वीजेच्या तारा आणि वायरिंगसंदर्भात कार्यवाही करण्याचे महावितरणला सांगितल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले.

