मुंबई

मुंबईला रेड अलर्ट : ठाणे, पालघरमध्ये 5 जणांचा मृत्यू

Shambhuraj Pachindre

मुंबई/ठाणे/रायगड : पुढारी वृत्तसेवा मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी सुरूच असून, बुधवारी उल्हास, पातळगंगा, सावित्री, आंबा, वालधुनी, पुंडलिका, सूर्या या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. पालघर, वसई, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे परिसरात वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. भिवंडीतील दोघा भावांचा वारणा नदीत बुडून मृत्यू झाला तर वसईमध्ये वालिव भागात डोंगरपायथ्याशी चाळीवर दरड कोसळून बापलेकीचा मृत्यू झाला. या मुसळधार पावसाने कोकणातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत.दरम्यान, राज्यात आणखी तीन दिवस म्हणजे रविवारपर्यंत अतिवृष्टीची शक्यता असून, पालघर, नाशिक आणि पुण्यासाठी 'रेड अलर्ट' देण्यात आला आहे.

मुंबईलाही गुरुवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत अधूनमधून वादळी वारे 45 ते 65 किमी प्रतितास वेगाने वाहतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. मुंबईला बुधवारीही दिवसभर पावसाने झोडपले आणि ठिकठिकाणी वाहतुकीचा खेळखंडोबा झाल्याने चाकरमान्यांचे आणि शाळकरी मुलांचेही हाल झाले.

रायगडची 17 धरणे भरली

रायगडमधील 17 धरणे ओव्हरफ्लो झाली असून, बारवी धरणात 64 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वांद्री, कुर्जे ही धरणेही ओसंडून वाहत आहेत. पांढरतारा, मेढे पूल पाण्याखाली गेले आहेत. उल्हास खोर्‍यातून वेगवान प्रवाहाने पावसाचे पाणी उल्हास खाडीला येऊन मिळत असल्याने खाडीची पाणीपातळी वाढली आहे. त्यात बुधवारी दुपारी समुद्राला भरती असल्याने कल्याण, दुर्गाडी, डोंबिवलीजवळच्या सखल भागात खाडीचे पाणी शिरले. या भागातील रहिवाशांना बाहेरचा आसरा घेण्याची वेळ आली आहे.

बुधवारचा दिवस उधाणाचा होता. त्यानुसार दुपारी 11.24 वाजता 4.35 मीटर उंचीच्या लाटा समुद्रकिनारी धडकू लागल्या होत्या. याचा तडाखा खाडीलगतच्या गावांना बसला. अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातून वाहणार्‍या सावित्री, काळ व गांधारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून महाड परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. कुंडलिका नदी पुन्हा धोक्याची पातळी ओलांडण्याची चिन्हे दिसताच दुपारी भोंगे वाजवून नगरपालिकेने नदीकाठच्या लोकांना सतर्क करण्यात आले. कुंडलिका नदीच्या जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पावसाने सरासरी ओलांडली

राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच धूमशान सुरू करणार्‍या पावसाने तेरा दिवसांतच जुलै महिन्याची सरासरी ओलांडली असून, सरासरीपेक्षा 26 टक्के अधिक पाऊस पडला आहे. राज्यात सर्वच जिल्ह्यांत पावसाचा तुटवडा निर्माण झाला होता. अनेक जिल्हे तर पावसाच्या सरासरीत उणे 43 टक्क्यांपर्यंत मागे पडले होते. मात्र, सहा दिवसांत पावसानेे सगळे चित्रच बदलून टाकले. 13 जुलैपर्यंत सरासरीपेक्षा 26 टक्के अधिक पाऊस कोसळला. यामुळे राज्यभरातील धरणे भरू लागली असून, अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागातील सर्व धरणांत मागील वर्षीपेक्षा 10.23 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी सर्व धरणांत 28.73 टक्के पाणीसाठा होता. सध्या 38.96 टक्के पाणीसाठा झाला आहे.

मुंबई : रस्त्यात ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहनांचा खेळखंडोबा झाला. पावसाच्या धुरकट वातावरणामुळे मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाड्यांचा वेगही मंदावला आहे. त्यामुळे बुधवारी दोन्ही मार्गांवरील गाड्या पाच ते दहा मिनिटे विलंबाने धावत होत्या.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT