मुंबई : पुढारी वृत्तसेवा उत्तम संगीतकार होण्यासाठी केवळ वडिलोपार्जित वारसा असून चालत नाही. तपश्चर्या, जिद्द महत्त्वाची आहे, असे सांगत ज्येष्ठ संगितकार देवदत्त साबळे यांनी आपल्या यशाचे गमक उलगडले. महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास आयोजित परेल येथील दामोदर नाट्यगृहात आयोजित केलेल्या लोकरंग महोत्सवात मंगळवारी मराठी कलाभ्यासक डॉ. जितेंद्र जाधव यांनी संगीतकार साबळे यांची प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या 50 वर्षांच्या सांगितीक प्रवासाला उजाळा दिला. संगीतकार आणि लोकमहोत्सवाचे संगीत संयोजक मनोहर गोलांबरे यावेळी उपस्थित होते.
संगीत कलेचे मला प्राथमिक धडे माझे वडील, महाराष्ट्राचे दिग्गज शाहीर साबळे यांची गाणी ऐकताना मिळाले. ही वस्तुस्थिती असली तरी उत्तम संगीतकार होण्यासाठी केवळ वडिलोपार्जित वारसा असून चालत नाही तर त्यासाठी साधना, तपश्चर्या आणि जिद्द महत्वाची असते, असे साबळे यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. रसिकांना नेमके काय हवे याचा वेध घेत, त्यांना समजेल अशा साध्या रचनेतून आपण संगीत लोकांपर्यंत नेले आहे, हेच आपल्या यशाचे गमक आहे, असे म्हणाले.
ज्येष्ठ कवियत्री शांता शेळके यांनी अवघ्या दोन दिवसांत गाणी लिहून दिली आणि त्यावेळचे ज्येष्ठ संगीतकार खळे काका यांनी रेडिओवर या गाण्याच्या प्रसारणाला संधी प्राप्त करुन दिली. त्यामुळे संगीतातील माझी मेहनत मला सर्वांना दाखवून देता आली आहे, अशी आठवण देवदत्त साबळे यांनी यावेळी करून दिली. कार्यकारी विश्वस्त संतोष परब यांच्या सहयोगातून आणि सायली परब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष किसन जाधव, विश्वस्त अशोक सावंत, डॉ. सुनील हळुरकर, बाळा खोपडे, राजू शेरवाडे संगीतकार महादेव खैरमोडे, डॉ. किशोर खुशाले आदींची उपस्थित लक्षणीय ठरली. दैनिक पुढारीच्या विशेष सहकार्याने हा महोत्सव सुरू आहे.
लोकरंग महोत्सवातील देवदत्त साबळे संगीत रजनीमध्ये 'मनाच्या धुंदीत लहरीत ये ना' आणि 'ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु' या संगीतकार देवदत्त साबळे यांनी 42 वर्षांपूर्वी अजरामर केलेल्या गाण्याचे गायक गौरव दांडेकर यांनी सादरीकरण केले. या अवीट गोडीच्या गाण्यावर उपस्थित रसिक प्रेक्षक बेधुंद झाले. देवदत्त साबळे यांची सुस्वर आवाजात गाणी समीर लाड, अनया सावंत, ब्रह्मानंदा पाटणकर यांनी सादर केली. वादकांनी आपली कामगिरी उत्तम बजावताना महोत्सवात चांगलाच रंग भरला.
हेही वाचा