Vikas Gogawale Bail Rejected: रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या खळबळजनक राडा प्रकरणी राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मोठा कायदेशीर झटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असून, पोलीस आता त्यांच्या शोधात आहेत. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या विकास गोगावले यांची माहिती देणाऱ्याला शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
२ डिसेंबर २०२५ रोजी महाड नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते सुशांत जाबरे आणि त्यांचे सहकारी मतदान केंद्राची पाहणी करत असताना मंत्रीपुत्र विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या राड्यात सुशांत जाबरे यांच्या गाडीची (फॉर्च्युनर) तोडफोड करण्यात आली. कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न (Attempt to Murder) आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास गोगावले यांनी अटकेपासून वाचण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळताना अत्यंत परखड मत व्यक्त केले. "लोकशाहीत एका जबाबदार मंत्र्याचा मुलगा जर अशा हिंसक गुन्ह्यात सहभागी होत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे," असे न्यायालयाने नमूद केले.
खासदार संजय राऊत यांनी यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून, "पोलिसांना मंत्र्यांचा मुलगा सापडत नाही की त्यांना अभय दिले जात आहे?" असा सवाल केला.
ते म्हणाले, राज्याच्या कॅबिनेटमधील मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे. त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही. फार गंभीर गोष्ट आहे. महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. काँग्रेसच्या एका कार्यकर्त्या मारण्याचा प्रयत्न झाला अन् पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली.'
'उच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला म्हणजे प्रकरण गंभीर आहे. मंत्री, मंत्र्यांची मुलं, भाऊ यांनी खून केले, चोऱ्या केल्या, दरोडे टाकले तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभय दिलं आहे का?' असा प्रश्नही विचारला आहे.