मुंबई: भारतीय प्रशासकीय सेवेचे प्रवेशद्वार असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. कठीण आणि आव्हानात्मक अशा या प्रतिष्ठेच्या परीक्षेत राजस्थानच्या डॉ. अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राजेश्वरी सुवे एम. यांनी दुसरा, आकांश धुल यांनी तिसरा, राघव झुनझुनवाला यांनी चौथा तर ईशान भटनागर यांनी पाचवा क्रमांक मिळवला आहे. या निकालानुसार देशभरातून एकूण 958 उमेदवारांची विविध अखिल भारतीय आणि केंद्रीय सेवांसाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 60हून अधिक विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवत आपली छाप उमटवली आहे. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश आहे. ऋषिकेश आलासे या विद्यार्थ्याने देशात 61 वा क्रमांक मिळवत राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य लेखी परीक्षा ऑगस्ट 2025 मध्ये घेतली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या व्यक्तिमत्व चाचण्या (मुलाखती) डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात आल्या. लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यांतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करून आयोगाने निकाल जाहीर केला आहे. या यादीतील उमेदवारांची नियुक्ती भारतीय प्रशासकीय सेवा (आएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) तसेच केंद्र सरकारच्या गट ‘अ’ आणि गट ‘ब’ सेवांमध्ये करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
निकालातील पहिल्या 100 क्रमांकांतही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे. यंदा राज्यातून ऋषिकेश आलासे या उमेदवाराने प्रथम क्रमांक पटकावत देशपातळीवर 61 वा क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर आकाश त्रिवेदी (73) गौरव चोप्रा (83) सायली पगार (87), दीक्षा पाटकर (88), या चौघांनी उत्तम कामगिरी करत देशभरातील अव्वल 100 उमेदवारांच्या यादीत स्थान पटकावले. त्यासोबत ऋतुजा गायकवाड (106), वरुण टोकस (117), अंकिता अनिल पाटील (140), आर्यन सिरसीकर (175), कार्तिक बच्छाव (177), हे पाच जण राज्यात अव्वल दहांमध्ये आहेत.
संगमनेर तालुक्यातील जोरवे गावातील धनंजय दिघे यानेही यंदा ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली असून देशातून तो 529 वा आला. या आधी त्याने दोन वेळा प्रयत्न केला होता. पहिल्या प्रयत्नात मला प्रिलीमही पार करता आली नाही. दुसऱ्या प्रयत्नात मी जेमतेम प्रिलीम पार केली. आता तिसऱ्या प्रयत्नात मला यश मिळाले आहे. मला आयपीएससाठी प्रयत्न करायचे आहेत. ते नाही झाले, तर भारतीय महसूल सेवेचाही पर्याय निवडेन, असे त्याने सांगितले.
देशात 140 वा क्रमांक मिळवलेल्या अंकिता पाटील यांनीही ही परीक्षा दुसऱ्यांना यशस्वीपणे उत्तीर्ण केली. गेल्या वर्षी त्यांना संपूर्ण देशात 303 रा क्रमांक मिळाला होता. सध्या त्या भारतीय आयकर विभागात प्रशिक्षण घेत आहेत. मात्र त्यांनीही आयएएस होण्याच्या जिद्दीने पुन्हा परीक्षा देत यश संपादन केले.मी यंदा आयएएस आणि आयपीएस या सेवांसाठी प्रयत्न केला होता. त्यापैकी एक सेवा मला नक्की मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्याच्या आकाश ओम त्रिवेदी या 23 वर्षीय उमेदवाराने यंदा देशात 73 वा क्रमांक पटकावला. यंदा हा दुसरा प्रयत्न होता. गेल्या वर्षी मी राखीव यादीत होतो आणि भारतीय रेल्वे सेवेत निवड झाली होती. पण यंदा मी पुन्हा परीक्षा दिली, असे आकाशने सांगितले. आकाशने आयआयटी कानपूरमधून कम्प्युटर सायन्समधून शिक्षण पूर्ण केले आहे. जेईईच्या तयारीचा फायदा झाला, पण इतिहास आणि भाषा यांच्यासाठी मेहनत घ्यावी लागली, असे त्याने सांगितले.
महाराष्ट्रातील 60हून उमेदवारांनी नागरी सेवा परीक्षेत यश मिळवले असून त्यामध्ये हृषीकेश आलासे (61) आकाश त्रिवेदी (73) गौरव चोप्रा (83) सायली पगार (87), दीक्षा पाटकर (88), ऋतुजा गायकवाड (106), वरुण टोकस (117), अंकिता अनिल पाटील (140), आर्यन सिरसीकर (175), कार्तिक बच्छाव (177), राहुल पाटील (224), शुभम शरद बेहेरे (226), ऋषिकेश पालिमकर (283), मोहिनी जगताप (323), अभिषेक ओझार्डे (336), हर्षवर्धन पाटील (349), हर्षवर्धन तिडके (355), कुणाल अहिरराव (430), अभिषेक मगदूम (449), धनश्री अहिरे (489), मनोज पाटील (493), विशाखा कदम (504), नंदिनी पाटील (512), रजत वाळके (514), निखिल तांबे (517), श्रुती चव्हाण (527), धनंजय दिघे (529), संकेत कुंभार (539), साईराज पाटील (545), आरुषा पाटील (553),
पारस मिस्त्री (555), बापूसाहेब गायकवाड (561), प्रवीण कोळपे (584), अविष्कार डेर्ले (591), रोहित माळवेकर (601), अभिषेक टेकाडे (610), सिद्धार्थ तागड (619), भाग्यश्री नायकेले (647), शिवम वखारे (651), पांडुरंग कांबळी (660), अश्विनी कोळेकर (675), प्रज्वल नासरे (677), अल्पेश ढवळे (687), सूरज सूर्यवंशी (702), रामेश्वर शिंदे (705), बसवराज पाटील (739), प्रीतकुमार भाले (742), राजश्री देशमुख (754), चेतन ठाकरे (762), प्रांजली मेश्राम (767), मनीष झेंडे (788), प्रथमेश शिंदे (817), राहुल चांडोलकर (831), हेमकृष्ण पिसाडे (849), अतुल राजुरकर (863), रोहित सांगळे (865), सुरेश बोरकर (912), प्रेरणा खवले (913), अनिकेत अहिरे (941)