Uddhav-Raj Thackeray press conference : "देशातील तरुण पिढीने अर्थात ‘जेन झी’ने आपल्या सनदशीर आंदोलनाच्या जोरावर केंद्र सरकारचा मस्तवालपणा उतरवला आहे. ‘जेन झी’ झीने सरकारची मस्ती जिरवली आहे आणि त्यांच्या झिंज्या उपटल्या आहेत. या विद्यार्थ्यांनी अख्ख्या देशाला भयाने पछाडलेल्या जाळ्यातून बाहेर काढले असून, देशात युवाशक्ती एकत्र आल्यास ती काय करू शकते, याची ही फक्त एक झलक आहे," अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (आज दि. २५) संयुक्त पत्रकार परिषदेत जंतर मंतरवर सुरु असणार्या विद्यार्थी आंदोलनांचे कौतूक केले. तसेच, उद्या शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा निघणारच, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजप सरकारने देशात असा भ्रम निर्माण केला होता की, देशात आता नागरिक उरलेलेच नाहीत, ती केवळ झुरळे आहेत. परंतु, या एका 'झुरळाने' (सामान्य विद्यार्थ्याने) हुकूमशाही सरकारला झुकवून दाखवले आहे. हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. या ऐतिहासिक आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपके यांचे मी मनापासून अभिनंदन करतो."
"अभिजित दिपके यांनी आंदोलन मागे घेतलेले नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी मान्य झाली असली, तरी विद्यार्थ्यांच्या आणखी दोन महत्त्वाच्या मागण्या अद्याप बाकी आहेत. त्या मान्य होणे अत्यंत आवश्यक आहे," असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आंदोलनादरम्यान घडलेल्या प्रकारावर ताशेरे ओढताना उद्धव ठाकरे यांनी गृह मंत्रालयावर गंभीर आरोप केले. "विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनात साध्या वेषातील गुंड घुसवण्यात आले होते. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आता स्पष्ट खुलासा करावा की, या निष्पाप विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार आहेत का?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
"जेन झी'ने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत," असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलक तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. "मुख्यमंत्री फडणवीस अचानक दिल्लीला का गेले, हे मला माहित नाही. त्याबाबतचा खुलासा त्यांनी स्वतःच करायला हवा," असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उद्याचा नियोजित मोर्चा वेळेवरच निघणार असल्याचे स्पष्ट करत दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्कपासून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा भव्य मोर्चा काढला जाणार असून, त्यात नागरिकांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.