Uddhav Thackeray on Gopinath Munde death
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : "गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला. मराठवाड्याला नेता म्हणून शिल्लक ठेवायचे नाही असे यांनी ठरवले आहे. नेते मारले की तुम्ही मेंढरे मागे येतील असे त्यांना वाटते," अशा शब्दांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा साधला.
माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमदार, खासदार आता पुरस्कारही विकत घेतायत. आज जरांगे मुंबईला चालले होते. एक माणूस प्राणपणाने लढतोय. दुसरा लंडनमध्ये जाऊन पुरस्कार घेतोय. मंत्रिमंडळातील हे बसरे बैल तुम्हाला न्याय देतील का, असा सवाल करत जाहिरातबाजी करायला यांच्याकडे पैसे आहेत. गरीब शेतकऱ्याचा पोरगा हेलिकॉप्टरने शेतात जातो. लंडनला जाऊन पुरस्कार विकत घेतो, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे, तो कसा साजरा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शहरात चांगले बोर्ड लागलेत. हे बोर्ड पाहिल्यावर आनंदीआनंद वाटेल; पण वास्तव परिस्थिती काय आहे, असा सवाल करत मुख्यमंत्री इथे असतील तर त्यांनी येऊन उत्तरे द्यावीत. उपमुख्यमंत्री ढोकळा खायला गेलेत तिकडे, पण इकडे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला आले नाहीत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मराठवाडा हा लढणारा आहे, रडणारा नाही. शेतकरी आत्महत्या करण्यासाठी लढा दिलात का तुम्ही, असा सवालही त्यांनी केला.
शेजारील राज्य कर्नाटकमधील सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. पण महाराष्ट्राच्या सरकारने पंचांगात ५ ऑक्टोबरचा मुहूर्त दिलाय. खड्ड्यात घाला तुमचा मुहूर्त. सरकारमध्ये अकलेचा दुष्काळ आहे. जोपर्यंत सत्तेचे लोडशेडिंग करत नाही तोवर तुम्हाला न्याय मिळणार नाही. आजची ही ठिणगी आहे. सरकारला लाज असेल तर त्यांनी तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
विदर्भातही आम्ही शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार आहोत. फसवे प्रकल्प तुमच्यावर लादले आहेत. दम असेल तर फुटीर आमदार-खासदारांनी सरकारला जाब विचारावा. ५ ऑक्टोबरनंतर आम्ही पंचनामे होतात की नाही हे बघणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
एकजुटीची ताकद दिल्लीला दाखवून देऊया. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र राज्यात बहुभाषिक म्हणतात, हेच गुजरात, बंगाल, आंध्रमध्ये बोलू शकता का, असा सवाल करत त्यांच्या बाजूला सत्तालोलुप बसतात, अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.