मुंबई: जनता आमच्यासमवेत होती, त्यामुळे लोकसभेत आम्हाला कौल मिळाला. आभारी आहोत. पण चुकीच्या माणसांना उमेदवारी दिली, असे विधान करत रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागितली.
शिवसेनेतील त्यांचा गट सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरे करून सभा घेणार आहेत. रविवारी संजय दीना पाटील या बंडखोर खासदाराच्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांनी या मालिकेतील पहिली सभा घेतली.
निघून जाणाऱ्या खासदारांना गद्दार संबोधत मशालीवर लढून जिंकलेले पळून गेले, विझले, पण शिवसैनिकांच्या मनातील मशाली अधिकच पेटल्या असल्याचे सांगत मी तुमची माफी मागत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी भीती वाटली, असे काहीजण सांगताहेत. ते अनाकलनीय आहे. भाजपला सुरुवातीच्या काळात साथ देऊन आपण शिवसैनिकांनी मोठे केले, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आपली कारकीर्द काँग्रेसविरोधात
काल एकजण कोल्हापुरात येऊन गेला. त्याने नवीन शोध लावला. शिवसेना एक आहे असे सांगितले. मात्र शिवसेनाप्रमुख एकच होऊन गेले. शिवसेनाप्रमुखांनी दिलेले कवच आपल्याकडे आहे. भाजपने त्यांचे घर सांभाळावे, असा सल्ला देत त्यांना पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडत आहे म्हणून ते खासदार फोडत आहेत, असा आरोप ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर केला.
राजूल पाटील मातोश्रीसोबत!
खासदार संजय दिना पाटील यांनी उबाठाचे नेतृत्व अमान्य करत एकनाथ शिंदे यांच्या दिशेने प्रवास सुरू केला असला तरी नगरसेवक असलेल्या त्यांच्या कन्येने मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपण त्यांच्यासमावेत आहोत असे स्पष्ट केले. रविवारी ईशान्य मुंबईत उद्धव ठाकरे गेले तेव्हा राजूल यांनी त्यांच्या स्वागताची पोस्टर्स लावली होती.
खासदारांप्रमाणे मुंबईत अशा प्रकारचे कोणतेही बंड नगरसेवकांमध्ये होणार नाही असे बोलले जात असल्यामुळे त्या मातोश्री समवेत आहेत की खरोखरच त्या मनाने उबाठाबरोबर आहेत हे समजू शकले नाही. नागेश ष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर यांनीही आपण उबाठाबरोबरच असल्याचे जाहीर केले आहे. प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी मात्र वडील निघून गेले. मुले मात्र आमच्या समवेत आहेत याच्यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची भूमिका घेतली आहे.