नवी मुंबई: नवी मुंबईतील नेरूळमध्ये एल.पी. ब्रिजखाली बिकानेरसमोर तुंबलेल्या पाण्यात उघड्या वायरचा वीजप्रवाह उतरला आणि विजेच्या धक्क्याने उज्वला लक्ष्मण वाघ (१६) आणि शुभांगी सुभाष वालखंडे (२०) या दोन महाविद्यालयीन तरुणी गंभीर जखमी झाल्या. त्यांना डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नशिबानेच बचावलेल्या या दोघींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नवी मुंबईमध्ये बुधवारी सकाळपासून पावसाने जोर धरला होता नेरूळच्या एलपी चौकामध्ये पाणी साचलेले होते. तेथेच विद्युत वाहिनीची वायर उघडी पडली आणि विजेचा प्रवाह उतरलेल्या पाण्यात या दोघी शॉक लागून कोसळल्या. सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले.
वायर पालिकेचीच
भरपावसात तुंबलेल्या पाण्यात वीजप्रवाह सोडणारी ही वायर कुणाची यावरून महावितरण विरुद्ध नवी मुंबई महापालिका यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. ही वायर महावितरणची असल्याचा दावा महापालिकेने केला. मात्र, वीजजोडणी क्रमांक देत महावितरणने महापालिकेला उघडे पाडले. नेरुळच्या एल.पी. नाका पुलाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथदिवा वीजजोडणी क्र. 000283134121 वरून परिसरातील पथदिव्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे.
केबलचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्याने परिसर विद्युतभारित झाला आणि तेथून पायी जात असलेल्या दोन विद्यार्थिनींना वीजेचा धक्का बसला असू शकतो, असे महावितरणच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले.पथदिवा वीजजोडणी व त्यावरील आउटगोइंग केबल ही नवी मुंबई महापालिकेच्या मालकीची आहे. देखभालही पालिकाच करते, याकडेही महावितरणने लक्ष वेधले.
हा शॉक बसल्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली.पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. मनसे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी महापालिकेवर तोफ डागली. या प्रकाराची जबाबदारी निश्चित करा आणि दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली.