

जालना : यंदा एल निनोच्या प्रभावाने जालना जिल्हा तीव्र उन्हात जात आहे. उष्णतेची लाट पसरली आहे. सुमारे 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहचले. अशातच जिल्हाभरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. सध्या जिल्ह्यातील 43 गावे 31 वाड्यांना सुमारे 72 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
दरम्यान, जून महिना सुरू झाला तरी जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता कायम आहे. पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. पावसाळ्याचे संकेत मिळू लागले असले तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक भागांतील विहिरी आणि जलस्रोत कोरडे पडले आहेत. परिणामी नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाला टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
जिल्ह्यातील 43 गावांमधील 74 वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून एकूण 72 टँकर कार्यरत आहेत. त्यामध्ये 14 शासकीय आणि 58 खासगी टँकरांचा समावेश आहे. पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात मार्चपासूनच तापमानाचा पारा चढू लागला होता. एप्रिल आणि मे महिन्यात अनेक ठिकाणी तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशाराही दिला होता. त्यामुळे जलस्रोतांवरील ताण वाढून ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले.
बदनापूर तालुक्यात परिस्थिती सर्वाधिक गंभीर असून 16 गावांतील 27 वाड्यांना 32 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जाफराबाद, भोकरदन, अंबड आणि घनसावंगी तालुक्यांतील अनेक गावांनाही टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान, रोहिणी नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्यास टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे जालना, परतूर आणि मंठा तालुक्यांमध्ये यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीचा फटका बसलेल्या भागांमध्ये पाणीपुरवठ्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा जालनेकर करीत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाकडे लागले जिल्ह्याचे डोळे
उष्णतेच्या झळा आणि वाढत्या पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवला असला तरी दीर्घकालीन दिलासा केवळ मान्सूनच्या आगमनातूनच मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष आता पहिल्या दमदार पावसाकडे लागले आहे.