Land Acquisition Policy Mumbai Pudhari
मुंबई

Land Acquisition Policy Mumbai: तिसऱ्या मुंबईला गती; अटल सेतू प्रभाव क्षेत्रासाठी भूसंपादन धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी

22.5% जमीन परतावा योजना, FDI ला प्राधान्य; 124 गावांमध्ये सुनियोजित महानगर उभारणीला वेग

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नवी मुंबईच्या शेजारी होणाऱ्या तिसऱ्या मुंबईसाठी अर्थात अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू प्रभाव क्षेत्रासाठी नियुक्त नवनगर विकास प्राधिकरण तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी भूसंपादन व भूवाटपाबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

या निर्णयामुळे अटल सेतू प्रभाव क्षेत्रातील नियोजित शहरीकरण, औद्योगिक गुंतवणूक, लॉजिस्टिक्स, निवासी-वाणिज्यिक प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीस ठोस दिशा मिळणार आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम अन्वये परस्पर संमतीने ठरलेल्या रकमेवर कराराद्वारे किंवा 2013च्या ‌‘भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम‌’नुसार भरपाई निश्चित करून भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच रोख मोबदल्याऐवजी चटई निर्देशांक (एफएसआय) किंवा हस्तांतरणीय विकास हक्क तसेच आवश्यकतेनुसार सुविधांसाठी / बांधकामांसाठी अतिरिक्त स्वरूपात मोबदला देऊन भूसंपादन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या धोरणांतर्गत 22.5 टक्के जमीन परतावा धोरण लागू करण्यात येणार आहे. खासगी मालकीची जमीन वाटाघाटीद्वारे संपादन करताना नगर विकास विभागाच्या 1 मार्च 2014 व 28 मे 2014 रोजीच्या शासन निर्णयांनुसार प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड देण्याचे धोरण लागू करण्यात येणार आहे. 22.5 टक्के परतावा योजनेअंतर्गत देय भूखंडाचे क्षेत्र 40 चौ. मीटरपेक्षा कमी असल्यास रोख मोबदला देण्यात येणार आहे.

अविकसित भागांमध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी ‌‘पास-थ्रू पॉलिसी‌’ लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या धोरणानुसार भूसंपादन मोबदल्याची किंमत, पायाभूत सुविधा विकसित करण्याचा खर्च हप्त्यांमध्ये भूखंडधारकाकडून वसूल करण्यात येईल. भूसंपादनाचा पूर्ण खर्च, नोंदणी शुल्क व अस्थापना शुल्क भूखंडधारकाकडून वसूल करण्यात येईल. एमएमआरडीएकडून 15 टक्के अस्थापना खर्च आकारण्यात येईल. संबंधित क्षेत्रात पायाभूत सुविधा एमएमआरडीए पुरविणार नाहीत. पात्र प्रकल्प घटकास जमीन जशी आहे तशी तत्वावर देण्यात येईल. भविष्यात वाढीव मोबदला लागल्यास ती रक्कम भूखंडधारकाकडून वसूल केली जाईल. या अटींनुसार एमएमआरडीए व भूखंडधारक यांच्यात करारनामा करण्यात येणार आहे.

परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एमआयडीसीच्या धोरणानुसार अटल सेतू प्रभाव क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक आणणाऱ्या उद्योगांना प्राधान्याने भूखंड वाटप करण्यात येणार आहे. किमान 100 एकर जमीन घेणे बंधनकारक असून जमिनीच्या किमतीव्यतिरिक्त प्रति 100 एकर किमान 250 कोटी रुपये गुंतवणूक चार वर्षांत करणे अनिवार्य राहील. अविकसित जमिनीची विक्री किंवा हस्तांतरण करता येणार नाही. एकूण विकसित क्षेत्राच्या 25 टक्क्‌‍यांपर्यंत क्षेत्र एफडीआयसाठी अनुज्ञेय राहील. पात्रता व निकष एमएमआरडीएने निश्चित केलेल्या अटी-शर्तींनुसार राहतील.

मुंबईचा ताण कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती सुनियोजित महानगर वसवण्यासाठी तसेच महाराष्ट्राच्या अर्थगतीला चालना देण्यासाठी तिसऱ्या मुंबईचे स्वप्न नियोजनात आणले गेले आहे. 2013 मध्ये या तिसऱ्या मुंबईची घोषणा झाली.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मेट्रो व रेल्वे कनेक्टिव्हिटी हे तिसऱ्या मुंबईचे तीन आधारस्तंभ असतील.

तिसऱ्या मुंबईच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरडीएवर नियोजन प्राधिकरण म्हणून टाकण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर या प्रकल्पांच्या प्रभाव क्षेत्रांत रायगड जिल्ह्याच्या 124 गावांच्या जागी तिसरी मुंबई साकारली जाईल. तिसऱ्या मुंबईचा परिसर साधारण 324 चौरस किलामीटरचा असेल आणि याच भागात आता भूसंपादनाला वेग येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT