मृणालिनी नानिवडेकर
मुंबई: ओमराजे निंबाळकर नाराज झाले असल्याने शिवसेना उबाठाने परतीचे दरवाजे पुन्हा एकदा उघडे करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार किंवा मंगळवारी २१ किंवा २२ जून रोजी सर्व खासदारांना व्हिप पाठवून बैठकीला या, असे पुन्हा एकदा कळवले जाणार आहे.
संसदीय पक्षाच्या बैठकीत गैरहजर राहिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली, त्यास २४ तासांहून अधिक काळ उलटला आहे. यावर कोणत्याही खासदाराने उत्तर पाठवलेले नाही. मात्र तरीही त्यांना अद्याप पक्षाने काढून टाकले नाही. यामागे शिवसेनेची रणनीती असल्याचे समजते.
ओमराजे निंबाळकर निर्णयानंतर जर परत फिरणार असतील तर त्यांना संधी द्यायला हवी, असे शिवसेनेचे मत आहे. त्यासाठी उबाठातील काही व्यूहरचनाकार कामाला लागले आहेत. पुढच्या बैठकीत स्वाक्षरी करण्याचा निर्णय प्रत्यक्ष उपस्थित राहून केला काय तसेच पक्षाच्या नेत्यांविरोधात वक्तव्ये का केली, अशी विचारणा होणार आहे.
या कारणे दाखवा नोटिसीत तिसरे कलमही टाकले जाणार आहे. या नोटीसबाबत वेगळे मत नोंदवल्यास त्या खासदारांना माफ केले जावे, अशी उबाठाची रणनीती आहे. बंडखोरांची संख्या सहा झाली नाही तर पक्षांतर बंदीचा नियम लागू होणार नाही याबाबत नियम स्पष्ट आहेत.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अद्याप खासदारांच्या स्वाक्षरी उघड केलेली नाही किंवा बंडखोरांची लोकसभा अध्यक्ष दालनातील छायाचित्रेही अद्याप समोर आलेली नसल्याने नक्की काय झाले याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे सर्वसत्ताधीश केंद्र आणि राज्य सरकारला नमवण्याचे स्वप्न उबाठाने अद्याप सोडलेले नाही.