

मुंबई: धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या ताज्या वक्तव्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा बंडखोर खासदारांच्या गटस्थापनेबद्दल संभ्रम निर्माण झाला असला तरी रविवारी सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि हे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले असतील, असे खात्रीलायक वृत्त आहे.
संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, आणि नागेश पाटील आष्टीकर हे ठाकरे गटाचे चार खासदार आधीच जयपूरला गेले आहेत. शनिवारी मुंबईतील खासदार संजय दिना पाटीलही रवाना झाले.
ओमराजे निंबाळकर यांनी मात्र दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेईन, असे शनिवारी सांगितले. त्यातून त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र निंबाळकरदेखील रविवारी या खासदारांना जयपूरात जाऊन मिळणार असे सूत्रांचे म्हणणे आहे.
राजकारणात कमिटमेंट महत्वाची असते आणि निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांना शब्द दिला आहे तो शब्द ते पाळतील, असा दावा शिवसेना शिंदे गटाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी केला आहे.
रविवारी या सहा खासदारांचा एकत्रित फोटो आणि स्वाक्षरीचे कागद बाहेर येण्याची शक्यता आहे. पक्षातून बाहेर पडून २ तृतीयांश खासदारांचा गट म्हणून स्थापन होण्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया पूर्ण होत आली असून, त्याची औपचारिक घोषणा रविवारी होईल, असे शिवसेना शिंदे गटातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
शिवसेना ठाकरे गटातील बंडखोर खासदारांचे शिवसेना शिंदे गटात विलीनीकरण झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या लोकसभा खासदारांची संख्या ७ वरून १३ वर जाणार आहे. दरम्यान, बंडखोर खासदारांना ठाकरे गटाने नोटीस बजावली असून २४ तासांत उत्तर मागितले आहे. त्यानंतर कायदेशिर कारवाई करण्यास पक्ष मोकळा असेल असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.