मुंबई : राज्यात दावी-बारावीच्या शालान्त परीक्षेदरम्यान होणाऱ्या कॉपीच्या घटना रोखण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्राच्या वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे पत्रक काढले होते. यानंतर सर्वच केंद्रांवर तातडीने सीसीटीव्ही व्यवस्था उभारणे शक्य नसल्याने आता केंद्रांवर कठोर देखरेखीसाठी पर्यायी उपाययोजना म्हणून कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याचा निर्णय मंडळाने जाहीर केला.
एकीकडे शाळांना गेल्या 12 वर्षांत कोणताही निधी न देता शिक्षण विभाग एवढा आर्थिक भार कसा टाकू शकते, असा प्रश्न उपस्थित करीत शिक्षण मंडळ सीसीटीव्ही सक्ती करत असेल, तर त्यांनी आमच्या शाळा केंद्र म्हणून घेऊ नये, अशी भूमिका या संस्थाचालकांच्या संघटनांनी घेतली होती. त्यावर तोडगा काढत शिक्षण मंडळाने नवीन सूचना जाहीर केल्या आहेत.
या सूचनांनुसार सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध नसलेल्या परीक्षा केंद्रांवर कर्मचारी व पर्यवेक्षकांची अदलाबदल करण्यात येणार आहे. त्याद्वारे पारदर्शकता राखणे व गैरप्रकारांना आळा घालणे हा उद्देश आहे. बाहेरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून निरीक्षण अधिक कडक केले जाणार असून, केंद्रप्रमुखांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे.