Sharad Pawar Congress National President: महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) काँग्रेसमध्ये विलिनीकरण होण्याच्या चर्चांना वेग आला असतानाच, एक मोठा खुलासा समोर आला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. इतकेच नव्हे, तर या विलिनीकरणाच्या बदल्यात शरद पवार यांना थेट काँग्रेसच्या 'राष्ट्रीय अध्यक्षपदाची' मोठी ऑफर देण्यात आली होती, अशी खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गांधी घराण्यातील एका महत्त्वाच्या व्यक्तीने थेट शरद पवार यांच्याशी संपर्क साधून ही ऑफर दिली होती. शरद पवार यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि ज्येष्ठता पाहता, सोनिया गांधी आणि काँग्रेस हाय कमांड त्यांना ही जबाबदारी देण्यास उत्सुक होते. जर त्यावेळी शरद पवारांनी हा प्रस्ताव स्वीकारला असता, तर आज मल्लिकार्जुन खरगे यांच्या जागी शरद पवार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष दिसले असते. मात्र, पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी शरद पवारांनी ही 'विक्रांत' ऑफर अत्यंत नम्रपणे नाकारली होती.
त्यानंतर २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. महाविकास आघाडीला लोकसभेत मोठे यश मिळाले असले, तरी विधानसभा आणि त्यानंतरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राजकीय फटक्याला सामोरे जावे लागले. अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षाची झालेली पडझड आणि सध्याची बिकट राजकीय परिस्थिती पाहता, आता पुन्हा एकदा विलिनीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, यावेळी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला विलिनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षाच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी यावर बोलताना सांगितले की, "अशा कोणत्याही प्रस्तावाची अधिकृत माहिती अद्याप तरी नाही, परंतु भाजपच्या हुकूमशाहीविरोधात २०२९ च्या लढाईसाठी सर्व विरोधकांनी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे."
आता शरद पवारांचा हा नवीन प्रस्ताव काँग्रेस हाय कमांड मान्य करणार का आणि यावर सोनिया गांधी, राहुल गांधी काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जर हे विलिनीकरण झाले, तर २०२९ च्या निवडणुकांआधी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला एक मोठी वेगळी दिशा मिळू शकते.