मुंबई : महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये राज्य सरकारच्या विविध खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधात पक्षाच्या वतीने ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ ही मोहीम सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी मंगळवारी त्यांनी येथे दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य दिल्लीसमोर कधीच झुकले नाही. राज्याने देशाला दिशा दिली आहे. गेल्या 10 वर्षांत शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार मागे पडला आहे. राज्याला मागे घेऊन जाण्याचे काम भाजपने केले आहे. शेतकरी, नोकरदार, महिला याच्या अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. एकीकडे महागाई वाढलेली असताना दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांची 1500 रुपयांची बोळवण केली जात आहे. राज्यात महागाई, भ्रष्टाचार, घोटाळा, अत्याचार आदी घटनांत वाढ झाली आहे. याविरोधात आम्ही ‘हक्क मागतोय महाराष्ट्र’ अशी मोहीम राबविणार आहोत. त्यासाठी एक खास गीत तयार करण्यात आले आहे.