मुंबई: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या लाखो ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. एसबीआयच्या शाखा सलग सहा दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे.
एसबीआयच्या कर्मचारी संघटनांनी 25 आणि 26 मे रोजी संपाची हाक दिली आहे. 25 मे हा सोमवार आहे आणि 26 मे हा मंगळवार आहे. यापूर्वी, 23 मे, चौथा शनिवार आणि
24 मे, रविवार रोजी बँका बंद राहतील. बकरी ईदमुळे अनेक राज्यांमध्ये 27 आणि 28 मे रोजी बँका बंद राहणार आहेत. परिणामी, एसबीआयच्या शाखा ग्राहकांसाठी एकूण सहा दिवस बंद राहतील.
या संपाद्वारे एसबीआयचे कर्मचारी त्यांच्या हक्कांचे संरक्षण, चांगले कामाचे वातावरण आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करत आहेत. हा संप ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने जाहीर केला आहे.
फेडरेशनचा दावा आहे की कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकडे बऱ्याच काळापासून दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय, अनेक करारांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. हा संप प्रामुख्याने कामगार प्रवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी असेल.
युनियनचा आरोप आहे, की बँकेतील अनेक निर्णय कर्मचाऱ्यांशी पूर्व सल्लामसलत न करता लागू केले जात आहेत, ज्यामुळे त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे.