Sanjay Raut On Sharad Pawar: संजय राऊत यांनी आजच्या (दि. १४ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत अनेक मोठे दावे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत याबाबत संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहेत. त्याचबरोबर त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होण्याची शक्यता वाटत नाही झालंच तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भाजपमध्ये विलिनीकरण होईल असा दावा केला आहे.
संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेत म्हणाले, 'शरद पवार पुन्हा राज्यसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी मला सांगितलं आहे. आता यानंतर महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची चर्चा होईल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे. ती काँग्रेसला देखील सांगितली आहे. आमच्याकडे एक राज्यसभा सीट निवडून आणण्याइतपत संख्याबळ आहे.'
संजय राऊत यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी, 'जर दोन राष्ट्रवादी पक्षांचे विलिनीकरण होणार असेल तर पहावं लागेल. मग त्यांची भूमिका बदलू शकते. मात्र मला विलिनीकरण होईल असं वाटत नाही. झालंच तर आनंद आहे. शरद पवार यांची ४० - ४५ मतं वाढतील.'
संख्याबळाबाबत बोलताना राऊत यांनी, 'महाविकास आघाडीकडे एक उमेदवार राज्यसभेत पाठवण्याइतपत संख्याबळ आहे. या क्षणी महाविकास आघाडीकडे एका उमेदवार राज्यसभेत जाऊ शकेल एवढी ४५ - ५० मतं आहेत.
प्रफल्ल पटेल यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, 'प्रफुल्ल पटेल बोलत आहेत त्याचा अर्थ अमित शहा बोलत आहेत. भाजप हा अदृष्य हात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गाटात अमित शहांच्या म्हणण्याप्रमाणे होईल. अजित पवार यांच्या गटाची सर्व सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही नाहीत. ती अमित शहा यांच्याकडे आहेत. विलिनीकरण झालंच तर ते भाजपमध्ये होईल.'
राऊत यांनी शिंदे सेनेचे देखील भाजपमध्ये विलिनीकरण होईल असा दावा केला. ते म्हणाले, 'शिंदेंचे देखील विलिनीकरण भाजपमध्ये होईल. अजित पवार हा एक खांबी तंबू होता. तो तंबू कोसळला त्यामुळं त्यांच्यातील घोडे उंट बैल गाढवं यांची धावाधाव सुरू आहे.'