Sanjay Raut on Jayant Patil Fadnavis Flight Meeting: "मुख्यमंत्री विमानात असतील तर विरोधकांनी विमानातून उडी मारायची का? उद्या माझा आणि मुख्यमंत्र्यांचा एकत्र प्रवास झाला, अथवा मी आणि राहुल नार्वेकर अलिबागला जाताना एकत्र बोटीत प्रवास करतो; मग आता बोटीतून बाहेर उड्या मारायच्या का?" असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. १०) माध्यमांशी बोलताना केला. जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र प्रवासावर भाष्य करताना, "हे मिलन किती काळ टिकतं ते पाहू," असा टोलाही त्यांनी लगावला.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यात काहीही गैर नाही. खासदार लपून-छपून भेटलेले नाहीत. माझी कालच सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाली असून, एकेकाने भेटण्यापेक्षा एकत्र भेटावे ही त्यांची भूमिका होती. शरद पवारांचा पक्ष 'इंडिया' आघाडीच्या विरोधात जाऊन काम करेल किंवा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देईल असे वाटत नाही, असेही राऊत म्हणाले.
आमचा पक्ष त्यांनी फोडून ऐऱ्या-गैऱ्याच्या हातात दिला आहे. अमित शाह यांना माफी नाही; आमची सत्ता आल्यावर आम्ही दाखवून देऊ. सत्ता गेल्यावर ८० टक्के भाजप आपोआप रिकामा होईल, असा दावाही त्यांनी केला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा आठवडा आहे. पेपरफुटी विधेयकावर चर्चा झाली असली, तरी तरुणांच्या आंदोलनावर पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले, याचे निवेदन गृहमंत्र्यांनी सभागृहात दिले पाहिजे, अशी आमची मुख्य मागणी आहे.
एखादी विधानसभा निवडणूक हरल्या म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचे १५ वर्षे नेतृत्व केले आहे. केंद्र सरकार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची संपूर्ण व्यवस्था ठेवते, मग पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे.