Sanjay Raut Criticized Ajit Pawar :
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या राजकीय वर्तुळातील चर्चेवर शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २१) भाजपवर बोचरी टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांना टोला लगावला. तसेच राज्यातील मतदार यादीतील घोळाबाबत १ नोव्हेंबर रोजी आयोजित मोर्चासाठी पूर्वतयारीच्या बैठका सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“ऐसा कोई सगा नाही, जिसे भाजपने ठगा नाही, अजित पवार हे भाजपपुढे किस खेत की मूली आहेत,” असे म्हणत राऊत यांनी भाजपसह अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
राजकारणामध्ये तुम्ही एकमेकांवर कितीही टीका केली तरी संकटकाळी सह्याद्रीचं हिमालय मदतीला जातो. शरद पवार देशाचे कृषिमंत्री, संरक्षणमंत्री होते. त्यांनी केलेलं काम, त्यांचा अनुभव आणि आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे असलेले संबंध यांचा उपयोग शेवटी केंद्र सरकारलाच करून घ्यावा लागतो. ही परंपरा आहे. नरेंद्र मोदी यांना ज्या दोन प्रमुख लोकांनी मदत केली त्यामध्ये शरद पवार आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे अग्रस्थानी आहेत. मी माझ्या पुस्तकातही हे लिहिले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या नेत्यांनी मदत केली; पण या मदतीचे पांग कसे पडले हे सुद्धा आपण पाहिले, असेही संजय राऊत म्हणाले.
“भ्रष्टाचार आणि पैशाचा अतिरेकी वापर करून काहीजण महाराष्ट्र आपल्या हातात ठेवू इच्छित आहेत; पण आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष माननीय राज ठाकरे हे महाराष्ट्र विचाराने आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून ढवळून काढणार आहेत. १ नोव्हेंबर रोजी मतदार यादीतील घोळाविरोधात काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोठे योगदान असेल. मोर्चा विराट होईल. उद्धव ठाकरे उपशाखाप्रमुखांचा मेळावा मुंबईत २७ ऑक्टोबर रोजी घेणार आहेत,” अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.
“महायुतीने मतचोरीच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस काय करत आहेत? तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या त्याबाबत लोकांपर्यंत पोहोचायचं असेल, तर त्या भाषेतच तुम्हाला ‘नॅरेटिव्ह’ सेट करावा लागतो. भाजपच्या आयटी सेलने राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याविषयी फेक नॅरेटिव्ह तयार केला आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.
“तुम्ही मतदार यादीत केलेले घोटाळे आम्ही पुराव्यासहित समोर आणले आहेत. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहोत — आम्हाला उत्तर द्यायला हवे. निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाच्या लोकांना वकील म्हणून नेमले आहेत का? निवडणूक आयोग, भाजप आणि त्यांचे बगलबच्चे हातात हात घालून काम करतात. त्यांची पार्टनरशिप आहे आणि त्याच पार्टनरशिपमधून विधानसभेचा विजय त्यांनी मिळवला, हे स्पष्ट आहे,” असा आरोपही संजय राऊतां केला.
“मुस्लिम या देशातला मतदार नाही का?” असा सवाल करत, “आम्हाला जे मतदान करणार आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार देऊ, असा कायदा नरेंद्र मोदी यांनी करावा. या देशात हिंदू, मुस्लिम, पारशी, शीख, जैन आणि ख्रिश्चन हे सर्व मतदार आहेत. फक्त भारतीय जनता पक्षाला मत देतात तेच मतदार — हा जर तुमचा अजेंडा असेल, तर तुम्ही पार्लमेंटमध्ये त्यासाठी बिल घेऊन या, आम्ही चर्चा करू,” असे आव्हानही त्यांनी केंद्र सरकारला दिले.