मुंबई : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर बुलढाणा व जालना जिल्ह्यात 9 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गॅन्ट्री उभारण्याचे काम 9 टप्प्यांत प्रस्तावित आहे. या काळात काही भागांतील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातून जाणाऱ्या 300.400 किमी ते 365.800 किमी दरम्यान महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. प्रत्येक संबधित वाहिनीवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांच्या कालावधीकरता पूर्ण थांबवण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.
मुंबई वाहिनीवर 9 ते 11 फेब्रुवारी आणि 13 ते 17 फेब्रुवारी या काळात दुपारी 12 ते 1 दरम्यान गॅन्ट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे. 9, 10 व 12, 13 तसेच 16, 17 फेब्रुवारी या कालावधीत दुपारी 3 ते 4 या वेळेत नागपूर वाहिनीवरील वाहतूक बंद राहील.