मुंबई: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आज (6 एप्रिल) राज्यभर सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीनंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
राज्यातील 8 हजार 701 शाळांमधील 1 लाख 14 हजार 826 जागांसाठी यंदा तब्बल 2 लाख 89 हजार 498 अर्ज दाखल झाले आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या जवळपास दुप्पट असल्याने अनेक जिल्ह्यांत प्रवेशासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया 9 जानेवारीपासून सुरू केली होती. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत होती. दरम्यान, विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या परिसरातील शाळा निवडण्याची अट उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर अर्ज प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देत संधी देण्यात आली होती.
गेल्या वर्षी 3 लाख 5 हजार 151 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्या तुलनेत यंदा अर्जांची संख्या किंचित घटली असली, तरी जागांच्या तुलनेत स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. पुणे (54 हजार 684 अर्ज), नागपूर (25 हजार 397), ठाणे (25 हजार 21) आणि नाशिक (17 हजार 542) या जिल्ह्यांत सर्वाधिक अर्ज आले आहेत.
या सोडतीचे थेट प्रक्षेपण आणि त्याच्या यूट्यूबची लिंक सर्वांना उपलब्ध केली जाणार आहे. या सोडतीनंतर प्रत्येक लाभार्थ्यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.