Rohit Arya Contact Marathi Actress:
मुंबई पोलिसांनी १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊटर केला आहे. याबाबत सध्या वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. दरम्यान रोहित आर्य हा 'लेट्स चेंज फोर' (Let's Change Four) नावाच्या वेब सिरीजचे शूटिंग करणार होता. याच निमित्ताने त्याने चित्रपट निर्माता असल्याची बतावणी करत अभिनेत्री रुचिता जाधव यांच्याशी संपर्क साधला होता. ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी रुचिता जाधव यांनी रात्री ७:२० वाजता रोहित आर्यला फोन केला आणि त्यांच्यात संवाद झाला. याबाबतची माहिती खुद्द अभिनेत्री रुचिता जाधव यांनी पुढारी न्यूजशी बोलताना दिली.
रोहित आर्यने रुचिता जाधव यांना जी कथा प्रत्यक्षात घडवून आणली, तीच कथा त्यांना वेब सिरीजसाठी सांगितली होती. म्हणजेच, "एक निरपराध माणूस मुलांना स्टेजवर घेऊन जातो, जेणेकरून ते त्यांचा संदेश सरकारपर्यंत पोहोचवू शकतील."
रोहित आर्यने रुचिता जाधव यांना या वेब सिरीजमध्ये दोन भूमिकांसाठी विचारणा केली होती. एक म्हणजे जी शिक्षिका त्या मुलांसोबत किडनॅप होते, तिची भूमिका आणि दुसरी म्हणजे आईची भूमिका, जी अपहरणकर्त्याचा संदेश मीडिया आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवते.
रोहित आर्यने रूचिता यांना २७, २८ किंवा २९ ऑक्टोबरला भेटायला जमेल का, अशी विचारणा केली होती. रुचिता यांनी २८ तारीख सांगितली होती.
सोमवारी त्यांनी मंगळवारी भेटायचं का, असा मेसेज केला. मात्र, रुचिता जाधव यांचे सासरे रुग्णालयात असल्याने आणि घरी कामाचा व्याप असल्याने त्यांनी येण्यास असमर्थता दर्शवली. त्यांनी १५ नोव्हेंबरनंतर भेटण्याचे सांगितले, ज्यावर रोहित आर्यने 'नो वरी, टेक केअर' असा प्रतिसाद दिला.
रुचिता जाधव पुढे म्हणाल्या की, "मी सकाळी ७ वाजता बातमी बघितली आणि मी पूर्णपणे हादरून गेले," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. "मी तिथे असू शकले असते," हा सगळ्यात मोठा विचार त्यांच्या डोक्यात आला. त्या प्रचंड घाबरलेल्या आहेत आणि अजूनही पूर्णपणे ब्लँक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
जाधव म्हणाल्या की, '४ ऑक्टोबरला त्याने जी कथा सांगितली, तीच प्रत्यक्षात घडवून आणली आहे. त्यामुळे हा कट नेमका कधीपासून शिजत होता, याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. हा संपूर्ण प्रकार पाहता, रोहित आर्यने आपल्या गुन्ह्याची योजना आखतानाच अनेक कलाकारांशी संपर्क साधला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.