मुंबई: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व युवा सेनेचे अध्यक्ष करण्याची मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी शिवसेनेच्या (शिंदे) वर्धापन दिन सोहळ्यात केल्याने तो चर्चेचा विषय बनला.
रामदास कदम म्हणाले, शिवसेनेला ६० वर्षे झाली आहेत. त्यापैकी ५७ वर्षांचा मी साक्षीदार आहे. अनेक वर्षे मी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिलो आहे. त्यांच्या पश्चात शिवसेना वाचविण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत.
त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून खासदार श्रीकांत शिंदे हे शिवसेना वाढविण्याचे काम करत आहेत. ऑपरेशन टायगरमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे, असे सांगत कदम यांनी श्रीकांत शिंदे यांचे अभिनंदन केले.
संजय राऊत यांनी तोंड सांभाळून बोलावे. आम्हाला तुडवा अशी चिथावणी देणाऱ्यांनो, आमच्या अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच आमच्याकडे येणाऱ्या सहा खासदारांच्या केसालाही धक्का लावाल तर शिवसैनिक तुमच्या घरात घुसतील, असा इशाराही कदम यांनी दिला.
संजय राऊत यांना इशारा
उबाठा गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर त्यांच्या कपड्याच्या चिंध्या करा, त्यांना तुडवा, अशी चिथावणीखोर भाषा करणाऱ्यांनी आपल्या औकातीत रहावे, असा इशारा शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना दिला.
उबाठा गटाला जय महाराष्ट्र करणाऱ्या खासदारांनी राजीनामा द्यावा, असे बोलणाऱ्यांनी आधी आमच्या चाळीस आमदारांच्या जीवावर राज्यसभेत जाणाऱ्या राऊत यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा, असे आव्हानही वाघमारे यांनी दिले.
तुम्ही एखाद्याला तुडवा म्हणता, पण तुमच्यामुळेच ऑपरेशन यूबीटी बुडवा सुरू आहे. आमच्या नेत्यावर टीका केल्यास आणि आमच्याकडे येणाऱ्या खासदारांना हात लावून दाखवा. तंगडे तोडू, असा इशारा त्यांनी दिला.
उद्धव आणि आदित्य यांच्यावर टीका करताना वाघमारे म्हणाल्या, मुंबई महानगरपालिका वगळता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या प्रचाराला उद्धव गेले नाहीत. मात्र दुसऱ्या बाजूला आमचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रचारासाठी फिरत होते.
त्यामुळेच शिवसेनेचे ६० वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य निवडून आले. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते प्रचाराला फिरले नाहीत, हे एकवेळेस मान्य करू. पण आदित्य ठाकरे कोल्ड कॉफी, नाईट लाईफ आणि पेंग्विन यातच मश्गूल होते, अशी टीकाही वाघमारे यांनी केली.
म्हणून बंडाची वेळ आली
ऑफलाइन सत्तेवरून ऑनलाईन सत्ता सुरू झाली म्हणून बंडाची वेळ आली, असा पुनरुच्चार करत मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला, तर अहिराणी भाषेत आम्ही शिवी दिली तर तुम्ही चार दिवस उठणार नाहीत, असा टोला संजय राऊत यांना लगावला. तुम्ही आमच्या आमदारांच्या जीवावर खासदार झालात.
तुम्ही बारमाही घरात राहता. पण आमचे नेते एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे गावागावांत जाऊन पक्ष संघटन वाढवतात. आता खासदारांनी झटका दिल्यानंतर आमदार यांच्यापाठोपाठ आता मुंबई महालिकेतील नगरसेवकही तुम्हाला झटका दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.