मुंबई: गँगस्टरही बोलणार नाही, अशी भाषा लोकप्रतिनिधी कशी करू शकतो? एवढे गंभीर वक्तव्य करूनही खासदार संजय दिना पाटील यांची चौकशी होत नाही. नेमके कुठले खून केले आणि कुठे बॉम्ब फोडले, याची चौकशी व्हायला नको का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी एसआयआर प्रक्रियेसंदर्भात शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या पदाधिकारी व मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी एसआयआर, बूथ लेव्हल एजंट नियुक्ती व मतदार यादीच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, एसआयआर संदर्भातील कामाला तातडीने वेग द्या. बीएलएची नोंदणी पुन्हा करावी लागणार आहे. निवडणुकांना सामोरे जात असताना आवश्यक यंत्रणाच नसेल तर लढणार कसे? २९ जूनपर्यंत अपेक्षित काम झाले नाही किंवा तक्रारी आल्या तर संबंधित पदाधिकाऱ्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखविला जाईल, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
मुंबईत ३ हजार बीएलए आवश्यक असताना केवळ ९९७ जणांची, तर उपनगरात ८ हजार बीएलएची गरज असताना २,५८१ नोंदण्या झाल्या आहेत. शहर व उपनगरातील बीएलए नोंदणीचे २९ जूनपर्यंत लक्ष्य पूर्ण झाले पाहिजे. यात हयगय चालणार नाही, असे ठाकरे यांनी बजावले.