Raj Thackeray -Adani Photo
मुंबई : भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याबरोबर राज ठाकरे व कुटुंबीयांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांनी या फोटोवर एक आठवण.. अशी टिप्पणी करत राज ठाकरेंना अदानी यांच्याबरोबरील भेटीचं स्मरण करून दिलं आहे. अदानी हे राज ठाकरेंच्या घरी आले होते, त्या भेटीची आठवण वाघ यांनी करून दिली आहे. तसेच ‘जय मनसे दे २००’ हप्तेवसुली थांबवून उद्योग क्षेत्रामध्ये आले तर त्यांचेही मोठं साम्राज्य तयार झालं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
याबाबत 'पुढारी न्यूज'शी बोलताना भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ म्हणाले की, मला या पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट करायचे आहे की, अदानी हे भारतीय जनता पक्षाचे जावई नाहीत. आम्हाला त्यांची बाजू घ्यायची गरज नाही. कोणताही भारतीय उद्योगपती प्रगती करत आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांमधील विमानतळ असो किंवा पोर्ट असो किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट घेऊन भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोलाची भर घालत असेल, तर त्याचा आम्हाला एक भारतीय म्हणून अभिमान असला पाहिजे.
भारतीय उद्योगपतींनी देशातील प्रकल्प द्यायचे नसतील तर मग काय परदेशी कंपन्यांना आम्ही पायघड्या घालायच्या का, असा सवाल करत काँग्रेसच्या राजवटीमध्ये सर्व परदेशी कंपन्या भारतामध्ये मोठमोठे मल्टीनॅशनल प्रोजेक्ट घ्यायच्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेक इन इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत देशातील मूलभूत सुविधा प्रकल्प भारतीय उद्योगपतींना देऊन प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे. केवळ अदानी नव्हे तर इतर अनेक उद्योगपती आज भारतामध्ये मोठे झालेले आहेत. अनेक स्टार्टअप प्लॅन्स पुढे झालेले आहेत, असेही वाघ यांनी स्पष्ट केले.
अदानी मोठं झालं तर राज ठाकरे यांच्या पोटात काय दुखतं?, असा सवाल करत ठाकरेंनी ‘जय मनसे दे २००’ अशी हप्तेवसुली थांबवून उद्योग क्षेत्रामध्ये आले तर त्यांची पण मोठं साम्राज्य तयार झालं असतं. त्यांचा पण आम्हाला अभिमान वाटला असता; परंतु कुठेही कुठलाही व्यवसाय न करणाऱ्या ठाकरे बंधूंना अदानींचा हेवा का वाटतो, हे माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. भारतामधला एखादा उद्योगपती मोठा होणं हे सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे, असेही वाघ यांनी सांगितले.
सर्वच प्रकल्प अदानींना का हा राज ठाकरेंचा प्रश्न अनाकलनीय आहे. असा एकही प्रोजेक्ट नाही आहे सरकारचा. आपल्याला सर्वांना माहिती आहे, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये टेंडर असतं. एक टेंडर प्रक्रिया असते. त्या टेंडर प्रक्रियेमध्ये जो सर्वोत्तम टेंडरर असतो, त्यालाच ऑर्डर मिळते. मुंबईमध्ये जवळजवळ २७ हजार कोटींचे एसटीव्हीचे प्रोजेक्ट झालेले आहेत. ते जवळजवळ सहा वेगवेगळ्या कंपन्यांना मिळालेत. एका कंपनीला मिळाले नाहीत. अदानींच्या मनात असतं आणि भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचा काही साटेलोट असता, तर हे २७ हजार कोटींचे प्रोजेक्ट अदानींना मिळाले असते. तसं काही झालेलं दिसत नाहीये, असा खुलासाही वाघ यांनी केला.
सात वेगवेगळ्या कंपन्यांना या मुंबईतले प्रोजेक्ट मिळालेले आहेत. प्रत्येक प्रोजेक्ट वेगळा आहे आणि प्रत्येक प्रोजेक्ट म्हणजे जो एल-वन आहे, ‘लोएस्ट टू विन’ या प्रक्रियेतून गेलेला आहे. ही सगळी प्रक्रिया पारदर्शी आहे. या प्रकल्पांबाबत कोणीही माहिती अधिकारान्वये कागदपत्र मागवू शकतो.
राज ठाकरेंनी जाहीर सभेत भारताचा नकाशा दाखवला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा नकाशा दाखवला. त्या महाराष्ट्रामधला एक प्रोजेक्ट अदानींचा आहे. तो म्हणजे त्यांनी चंद्रपूरमधील एक पब्लिक स्कूल ताब्यात घेतलं. चंद्रपूरमधल्या अतिमागास भागामध्ये एक पब्लिक स्कूल बंद पडलं होतं. त्याला सीएसआर फंड देऊन अदानींनी ताब्यात घेतलं, तर त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. धन्यवाद त्यांना दिले पाहिजेत की त्यांची हेटाळणी केली पाहिजे?, असा सवालही वाघ यांनी केला.