नवी मुंबई; पुढारी वृतसेवा मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर आज (दि. २३) सकाळी साडेसात वाजल्यापासून बोरघाट अमृतांजन ब्रीज ते दत्तवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे एक्सप्रेसवर संथ गतीने वाहतूक सुरू आहे. दिवाळी आणि रविवारी वीकेंड असल्याने सुमारे 40 ते 50 हजार वाहने या मार्गावर प्रवास करत असून, अवजड वाहने हळूवार मार्गस्थ होत असल्याने एक्सप्रेस वे वर वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
मुंबईतून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. बोरघाट टॅबचे महामार्ग वाहतूक पोलीस कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सकाळी दहा वाजता वाहतूक दुस-या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. यामुळे आता काही प्रमाणात वाहतूक कोंडी पासून वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. नियमित वाहन संख्येच्या तीन ते चारपट वाहने सकाळी सहा वाजल्यापासून मुंबईकडून पुण्याकडे प्रवासाला निघाल्याने या एक्स्प्रेसवर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
सायन टॅंकर, कंटेनर, एक्सेल वाहने पहाटे पुण्याच्या दिशेने निघाले. मात्र लोणावळा घाट चढताना वेग कमी करूनच ही वाहने मार्गावर धावत असल्याने आणि चारचाकी वाहनांची संख्या 40 ते 45 हजार एवढी वाढल्याने या वाहनांना मार्गावरून प्रवास करताना ओव्हरटेक करून पुढे जाण्यासाठी अडचणी येत आहेत. यामुळे एक्सप्रेस वेवरून प्रवास करताना दुहेरी कोंडीचा सामना करावा लागत आहे. दिवाळीची शाळेंना सुट्टी लागली आहे. अनेकांनी रस्ता मार्गे गावी जाण्यासाठी घरचा रस्ता पकडला आहे. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी वाहतुकीबाबत माहिती घेऊन बाहेर पडा. अन्यथा रस्त्याच अडकून पडण्याची शक्यता आहे. बोरघाट टॅबचे महामार्ग वाहतूक पोलीस कोंडी दूर करण्यासाठी अजून प्रयत्नशील आहेत.
हेही वाचा :