मुंबई: मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरात महिला ई-रिक्षा योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्ग निश्चित करा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.मंत्रालयात महिला ई-रिक्षा योजनेच्या अंमलबजावणीबाबत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
सरनाईक म्हणाले, कमी वेगाच्या ई-रिक्षा मुख्य रस्ते किंवा महामार्गांवर चालविण्याऐवजी अंतर्गत मार्गांवर चालविल्यास वाहतुकीला अडथळा येणार नाही. यासाठी वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे योग्य मार्ग निश्चित करावेत. ई-रिक्षांमध्ये उपलब्ध जीपीएसप्रणालीचा वापर करून त्यांचे नियंत्रण व निरीक्षणही प्रभावीपणे करावे.
ई-रिक्षांच्या वेग आणि क्षमतेसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि संबंधित उत्पादक कंपन्यांची संयुक्त बैठक घेऊन बॅटरी तंत्रज्ञानातील सुधारणा आणि आवश्यक तांत्रिक बदलांवर चर्चा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या, महिला ई-रिक्षा योजनेअंतर्गत शासनाचे योगदान २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. या योजनेत आता ५० टक्के कर्ज आणि १० टक्के लाभार्थी हिस्सा असेल.
तसेच एमएमआर परिसरात सध्या लागू असलेल्या तांत्रिक निकषांमुळे एल-३ प्रवर्गातील ई-रिक्षा सुरू करता आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ लक्षात घेऊन निवडक मार्गांवर ही योजना सुरू करण्याबाबत सूचनाही दिल्या आहेत, अशी माहिती तटकरे यांनी दिली.