मुलुंड: मुंबईतील पवई परिसरातील तुंगा गावात घरभाड्याच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका घरमालकाने एकच घर तब्बल १७ जणांना भाड्याने देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची रक्कम उकळल्याचा आरोप आहे.
या फसवणुकीमुळे परिसरात मोठी खळबळ माजली असून पीडित नागरिकांनी संताप व्यक्त करत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित आरोपी घरमालकाविरोधात पवई पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी घरमालकाने “हेवी डिपॉझिट”च्या नावाखाली प्रत्येक भाडेकरूकडून सुमारे ६ लाख रुपये घेतले. या भाडेकरूंशी घर भाड्याने देण्याचा करार करूनही प्रत्यक्षात घराचा ताबा न देता, भाडेकरूंना दर महिन्याला ठराविक रक्कम परतावा म्हणून दिली जात होती. त्यामुळे अनेकांना सुरुवातीला हा प्रकार लक्षात आला नाही.
या पद्धतीने १७ जणांकडून पैसे घेत आरोपीने अंदाजे सव्वा कोटी रुपयांची रक्कम जमा केल्याचा आरोप आहे. मात्र, एका दाम्पत्याला संशय आल्यानंतर त्यांनी तुंगा गावातील संबंधित घराला भेट दिली.
त्यावेळी घरावर बँकेची जप्तीची कारवाई झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या घरमालकाने बँकेचे कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे संबंधित मालमत्तेवर जप्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे समोर आले आणि त्यानंतर संपूर्ण फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी पीडित भाडेकरूंनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित घरमालकाविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, तसेच जमा केलेली रक्कम कुठे वापरण्यात आली याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र फसवणुकीच्या या घटनेमुळे मोठी खळबळ माजली असून नागरिकांनी सावध आणि सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.