पनवेल : पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या दिशेने भरीव कामगिरी करत पनवेल महापालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ अंतर्गत ‘अमृत शहरे’ (3 लाख ते 10 लाख लोकसंख्या) गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावून सर्वोत्तम हरित यश संपादन केले.
21 फेब्रुवारी रोजी डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा मानाचा माझी वसुंधरा 4.0 आणि 5.0 अभियानाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पनवेल महापालिकेतर्फे महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त स्वरूप खारगे व उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
माझी वसुंधरा 5.0 साठी एकूण 7 कोटीचे इतके बक्षीस जाहीर झाले असून यापूर्वीही माझी वसुंधरा 4.0 साठी एकूण 7 कोटी इतके बक्षीस प्राप्त झाले आहे. शहरात विविध हरित क्षेत्र, सौर ऊर्जेचे प्रकल्प, वृक्षारोपण तसेच वसुंधरेबाबत जनजागृती आदी उपक्रमांसाठी या निधीचा वापर करण्यात आला.
भूमी : या घटकांतर्गत मनपाने वर्षभरात देशी प्रजातीच्या झाडांची लागवड केली. झाडाचे संगोपन करून त्यांना जगवले. कचऱ्याचे घरोघरी संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली होती.
वायू : या घटकात मनपाने अभियान कालावधीत हवेची गुणवत्ता तपासून त्यावर उपाययोजना केल्या. सण, उत्सवात प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती केली. सातत्याने स्वच्छता मोहिमा राबवल्या. शहरातील तयार होणारा बांधकाम, पाडकामाचा राडारोडा, कचरा उचलून विल्हेवाट लावण्यात आली.
जल : या घटकात मनपाने शहरातील पाणीपातळी राखण्यासाठी उपाययोजना केल्या. शहरातील पाणीसाठ्यांची साफसफाई केली. शहरातील वडाळे तलाव व इतर तलावांत स्वच्छता करण्यात आली. सार्वजनिक इमारतीचे वॉटर ऑडिट करण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. गणपती विसर्जन दरम्यान जलप्रदूषण टाळण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम कुंड तयार केले. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना त्याचे फायदे तोटे समजावून सांगून इको फ्रेंडली मूर्तींच्या विक्रीसाठी व खरेदीसाठी प्रयत्न केले.
अग्नी : या घटकात मनपाने शहरात एलईडी स्ट्रीट लाईट लावण्याचे काम केले. शहरात विविध उद्यानात सोलर ट्री उभारले. विविध शासकीय इमारतींवर रूफ टॉप सोलार लावले. खासगी तत्त्वावर घरांवर सोलर बसवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच सार्वजनिक इमारतींचे एनर्जी ऑडिट करून त्यावर उपाययोजना केल्या.
आकाश : या घटकात मनपाने नागरीकांत अभियानाची माहिती पोहोचण्यासाठी स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली. शहर हरित करण्यासाठी नागरिक व विद्यार्थ्यांना हरित शपथ दिली. शहरातील पर्यावरणप्रेमी व्यक्तींची पर्यावरण दूत म्हणून निवड करून विविध कार्यक्रमांद्वारे व त्यांच्या सहभागाने शहरात जनजागृती करत अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण केले. या सर्व उपाययोजांमुळे महापालिकेला या वर्षीही पुरस्कार मिळाला आहे.
महापालिकेने ‘हरित पनवेल, स्वच्छ पनवेल, प्रगतीशील पनवेल’ या ध्येयवाक्याने नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळवत पर्यावरण संरक्षणाला लोकचळवळीचे स्वरूप दिले.