मृणालिनी नानीवडेकर
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरची बंगाली एडिशन समोर आली असतानाच आता महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने आपले खासदार सुरक्षित ठेवण्याचा चंग बांधला आहे.
या खासदारांशी संपर्क ठेवून कुणाचे काय सुरू आहे,कोणी वेगळ्या मन:स्थितीत तर नाही ना याची वास्तपुस्त गेल्या दहा महिन्यापासून करणे सुरु होतेच,आजपासून डोळ्यात तेल घालून नजर ठेवली जाणार आहे.
एका ज्येष्ठ नेत्याने गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही आमच्या खासदारांच्या संपर्कात आहोत, त्यांना काय हवे,काय नको याची जवळपास दररोज "प्रेमाने चौकशी" करतच आहोत पण आज तृणमूल काँग्रेस पक्षातील संभाव्य घडामोडींनी अधिकच सावध केल्याचे नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी "जे बंगालमध्ये घडले ते महाराष्ट्रातही केले जाणारच नाही कशावरून? " अशा आशयाचे विधान करीत आपण जागे रहा याची जाणीव करून दिली आहे.
काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातून निवडून आलेले खासदारही कुठे आहेत,ते काय करत आहेत याकडेही आता या मोठ्या पक्षाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा महाराष्ट्रातील या छोट्या दोन भावांनी व्यक्त केली असे विश्वसनीय रित्या समजते. उबाठातील सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहा असे खासदार हे ऑपरेशन टायगर चा भाग ठरण्याची शक्यता होती आणि आहे." महाराष्ट्रातले लक्ष्य एक डझन" असे गमतीने म्हटले जात होते.
पण ते आता खरे ठरते आहे की काय याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे आज राजकीय वर्तुळात बोलले जात होते. मात्र त्याचबरोबर तृणमूल काँग्रेस मधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी झाली तर दिल्लीत भारतीय जनता पक्षाला आता आपली गरज पडणार नाही असाही निष्कर्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा गटातील काही नेत्यांनी काढला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवळच्या सहकाऱ्यांसह ऑपरेशन टायगर केव्हाही करू शकतील अशा टप्प्यात होते. मात्र त्यांना नक्की संख्याबळ गाठता येते आहे काय? यासाठी थांबावे लागले होते.पर्याप्त संख्याबळ भारतीय जनता पक्षाला प्राप्त झाले तर मग या महाराष्ट्रातील घडामोडींची गरजच राहणार नाही याकडेही लक्ष वेधले जात होते.
अजित दादा यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ची बाजू कमकुवत झाली आहे.त्यामुळे येथे पक्षांतरासाठी काही करण्याची ताकद असलेला नेता सध्या तरी दिसत नाही.पार्थ पवार हे स्वतःला समोर करून नेता होण्याच्या प्रक्रियेत आहेत तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर काही अंतर्गत प्रश्न निर्माण केले असल्यामुळे तेही काही करण्याच्या परिस्थितीत नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फार काही घडण्याची शक्यता नाही असेही मानले जाते आहे मात्र महासत्तेची परवानगी मिळाल्यास एकनाथ शिंदे यांचे काही शिलेदार या पक्षातूनही खासदार फोडू शकतात असे नमूद केले जात होते.
भारतीय जनता पक्षाने या सर्व घटनांवर मौन बाळगले असले तरी कोणतीही घडामोडी आमच्या संमतीशिवाय घडणार नाही हे निश्चित आहे असे एका जेष्ठ नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर पुढारीशी बोलताना नमूद केले.