

मुंबई: मुंबईकर दहा टक्के पाणीकपात सहन करीत असताना सोमवारपासून मुंबईतील टॅकरमालकांनीही संप पुकारला आहे. सोमवारी दिवसभरात १८ हजारपैकी एकाही टँकरने मुंबईत पाणीपुरवठा झाला नाही.
पूर्वकल्पना असल्याने बांधकाम प्रकल्प व सोसायट्यांनी नियोजन केल्याने सोमवारी या संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र संप सुरूच राहल्यास मुंबईकरांची अडचण होणार आहे.
विहिरी आणि बोअरवेलमधून पाणी काढण्यास शासनाने हरकत घेतल्याने मुंबईतील वॉटर टँकरमालकांनी संपाचा इशारा दिला होता. सोमवारी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात टँकरमालकांशी चर्चा करण्यात आली.
केवळ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कारवाई केली नाही. त्यामुळे संप मागे घेण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने टँकरमालकांनी बेमुदत संप पुकारल्याचे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे प्रवक्ते अंकुर शर्मा यांनी सांगितले.
मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचे १८ हजार वॉटर टँकर मुंबईतील मोठ्या सोसायट्या, हॉटेल उद्योग, उद्याने, वाहतूक बेटे यांना दररोज ३५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सोमवारी येथे टँकरने पाणीपुरवठा झाला नाही. मात्र पूर्वकल्पना असल्याने टंचाई भासली नाही.
मुंबईत रस्त्यांच्या कामांसाठीही या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र ही कामे पालिकेने आता पासाळ्यामुळे थांबवली आहेत. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र पुढील दोन-तीन दिवस संप सुरूच राहिल्यास मुंबई मोठी पाणीटंचाई निर्माण होणार आहे.
दोन-तीन दिवसांचा साठा
मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संपाची पूर्वसूचना दिल्यामुळे अनेक सोसायट्यांनी दोन-तीन दिवस पुरेल एवढा पाणीसाठा राखून ठेवला आहे. शिवाय शनिवारपासूनच पाणीकपात केली होती. अनेक बांधकाम प्रकल्पांनीसुद्धा पाणी राखून ठेवले आहे. त्यामुळे दोन-तीन दिवस तरी संपाची मोठी झळ बसणार नाही.