CM Devendra Fadnavis 3.0 Key Decisions
देवेंद्र फडणवीस नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसर्यांदा विराजमान झाले आणि महाराष्ट्राच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले. महाराष्ट्राची पुढच्या ५० वर्षांची वाटचाल कशी असेल याचे नियोजन डोळ्यासमोर ठेवत महाराष्ट्रातल्या विकास कामांना गती देण्याचे काम देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्या वर्षात प्रामुख्याने केले आहे. यामुळे महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभे राहताना दिसत आहेत. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा पूर्ण बदलून जाणार आहे. एकीकडे प्रकल्पांना गती देताना दुसरीकडे जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देणारे विधेयके कायदेमंडळात मंजूर केले जात आहे. मुख्यमंत्रीपदाच्या तिसर्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या महत्वाकांक्षी कामांचा लेखाजोखा.
देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून पालघर जिल्ह्यात बांधण्यात येत असलेले वाढवण बंदर हे जगातील पहिल्या दहा सर्वांत मोठ्या बंदरांपैकी एक बंदर असणार आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या बंदरामुळे संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे. या नियोजित प्रकल्पाला केंद्र सरकराकडून परवानगी मिळाली असून त्यासाठी ७१,००० हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या बंदराचे काम दोन टप्प्यांत केले जाणार असून पहिला टप्प्याचे काम २०२९ मध्ये पूर्ण होणार आहे. वाढवण समुद्रकिनार्याची नैसर्गिक खोली २० मीटरपेक्षा जास्त असल्याने मोठ्या जहाजांना या बंदरावर ये जा करणे सुलभ होणार आहे. या बंदराचे काम पूर्ण झाल्यानंतर जेएनपीए बंदरावरचा ताण कमी होणार असून देशातील सर्वांत मोठी दोन बंदरे ही महाराष्ट्रात असणार आहेत. या बंदरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून या संबध परिसराचा कायापालट होणार आहे.
मुंबईमध्ये असलेल्या विमानतळावर असलेला वाढता ताण लक्षात घेता मुंबई शहराला अजून एका विमानतळाची नितांत आवश्यकता होती. मात्र प्रशासकीय अडचणीमुळे हा प्रकल्प अनेक दिवस अडकलेला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जमीन अधिग्रहण, पर्यावरण खात्याच्या परवानग्या आणि केंद्र सरकारचा निधी यांसारख्या अडथळ्यांवर त्यांनी मात केली आणि भारतातील सर्वांत मोठ्या ग्रीनफिल्ड विमानतळाचे ऑक्टोबर २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले. डिसेंबरअखेरीस या विमानतळावरून प्रवासी उड्डाणे सुरू होतील. नवी मुंबई विमानतळासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरासाठी पुरंदर विमानतळाची घोषणा करत या विमानतळाच्या कामाला गती दिली आहे.
मुंबई शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी २९.२ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड मुंबईत बांधला जात आहे. आठ लेनचा हा एक्सप्रेस-वे मरीन लाइन्सपासून कांदिवलीपर्यंत पसरलेला आहे. यामुळे दक्षिण मुंबई ते उपनगरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. एकूण मार्गापैकी नरिमन पॉईंट ते वांद्रे या मार्गाचे काम पूर्ण झाले असून, वांद्रे ते कांदिवली या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून १३,००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कोस्टल रोडमुळे मुंबई शहराच्या नावलौकिकात भर पडणार असून नागरिकांना प्रदूषणमुक्त प्रवास करता येणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली आणि वर्ष २०२६ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याची ध्येय निश्चित करण्यात आले आहे. ईस्टर्न फ्री वे ते मरीन ड्राईव्ह या नव्या भूमिगत मार्गाचेही नुकतेच भूमीपूजन करण्यात आले आहे.
जनसुरक्षा कायदा हा महाराष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेला बळकट करण्यासाठी आणलेला महत्त्वपूर्ण कायदा आहे. नक्षलवाद, माओवादी कारवाया आणि संविधानविरोधी हालचालींना आळा घालण्यासाठी या कायद्याची गरज होती. महाराष्ट्रातील काही भाग नक्षलवादाने प्रभावित असल्याने कठोर कायद्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात हा कायदा विधानसभेत सादर केला. हा कायदा सामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी नसून, लोकशाहीविरोधी व हिंसक कारवायांना रोखण्यासाठी आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.