Olive Crown Awards 2026
मुंबई : इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनच्या (IAA) इंडिया चॅप्टरतर्फे आयोजित १६ व्या वार्षिक 'ऑलिव्ह क्राउन अवॉर्ड्स'चा दिमाखदार सोहळा बुधवारी मुंबईतील 'ताज लँड्स एंड' येथे पार पडला. कला आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यात पर्यावरण जपण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उद्योगांना संबोधित करताना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी राजकीय नेतृत्वाला जाब विचारण्याचे आवाहन केले. तर बॉलिवूड अभिनेत्री आणि 'ग्रीन ॲम्बेसेडर' वाणी कपूर आणि आयएए (IAA) इंडिया चॅप्टरचे माजी अध्यक्ष नीरज रॉय यांच्यात 'जाणीवपूर्वक जीवनशैली' या विषयावर संवाद रंगला.
या पुरस्कार सोहळ्यात ' Chupps फूटवेअर' आणि 'इंटू क्रिएटिव्ह' या एजन्सीने १० पुरस्कार पटकावून नवा विक्रम घडवला. नैसर्गिक साहित्यापासून बनवलेल्या भारतातील पहिल्या 'बायोडिग्रेडेबल' होर्डिंगच्या जाहिरात मोहिमेसाठी त्यांना 'ग्रीन ब्रँड ऑफ द इयर' आणि 'ग्रीन ॲडव्हर्टायझर ऑफ द इयर' या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
ग्रीन क्रुसेडर ऑफ द इयर: नागणदी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या कार्याबद्दल 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ला सुवर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे स्वयंसेवी संस्थांनी सरकारसोबत मिळून काम करण्याचे आवाहन केले. कॉर्पोरेट सोशल क्रुसेडर यामध्ये 'एनव्हिजन एनर्जी इंडिया'ने सुवर्ण, तर अदानी समूह आणि दैनिक भास्कर समूहाने रौप्य पदक पटकावले.'चिराग रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन'ने ग्रीन एनजीओ ऑफ द इयरवर आपले नाव कोरले. तर 'रोटरी इंटरनॅशनल'ने रौप्य पदक पटकावले. वृत्तपत्र विभागात 'द हिंदू' समूहाने त्यांच्या पर्यावरणविषयक विशेष मोहिमांसाठी दोन सुवर्ण पुरस्कार पटकावले.
युवा नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, "पर्यावरण संरक्षण हा विषय सर्वसामान्यांच्या जगण्यातला विषय होण्याची गरज आहे. राजकीय नेत्यांना पर्यावरणाप्रती अधिक चांगले काम करण्यासाठी भाग पाडा आणि आम्हाला जाब विचारा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अभिनेत्री वाणी कपूरनेही रोजच्या जीवनातील छोट्या सवयी बदलून पर्यावरणावर मोठा सकारात्मक परिणाम घडवता येतो, असे मत व्यक्त केले.
आयएए इंडिया चॅप्टरचे अध्यक्ष अभिषेक कर्नानी म्हणाले की, "सर्जनशीलता म्हणजे केवळ उत्पादन विकणे नसून संस्कृतीला दिशा देणे आणि बदल घडवणे आहे. संवादामध्ये मोठी शक्ती आहे आणि त्याचा योग्य वापर केल्यास आपण येणाऱ्या पिढीसाठी अधिक चांगले भविष्य निर्माण करू शकतो."
आयएए ऑलिव्ह क्राऊन अवॉर्ड्सचे अध्यक्ष, जनक सारडा यांनी नमूद केले की, यंदा केवळ ब्रँड्सच नव्हे तर विविध उद्योग संघटनांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. हे पर्यावरण रक्षणाच्या चळवळीला गती मिळत असल्याचे लक्षण आहे. दरवर्षी, जेव्हा आम्ही गेलेल्या वर्षाचा आढावा घेतो, ब्रँड्स, एजन्सी, स्वयंसेवी संस्था आणि माध्यमांनी पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या कार्याचा उत्सव साजरा करतो. यावर्षी, आम्हाला उद्योग संघटनांचाही सहभाग दिसला आहे, हे एक स्पष्ट चिन्ह आहे की या कार्याला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. आता यावर केवळ चर्चा होत नाहीये; यावर कृती केली जात आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांचा हा एक उत्सव आहे. आम्हाला भारतातील शहरांमधून आणि जगभरातून मिळणाऱ्या प्रवेशिका, हे या कार्याला भौगोलिक आणि सामुदायिक स्तरावर किती खोलवर प्रतिसाद मिळत आहे याचा एक भक्कम पुरावा आहे." यावेळी सुंदरबन पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत ५० हेक्टर खारफुटीच्या जंगलाच्या संवर्धनासाठी वचनबद्ध असलेल्या 'एनव्हिजन'च्या लोगो डिझाइनसाठी शिबानी घराई यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
'ऑलिव्ह क्राउन' या नावामागे निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता दडलेली आहे. प्राचीन ग्रीसमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक खेळांतील विजेत्यांना 'ऑलिव्ह'च्या फांद्यांपासून बनवलेला मुकुट देऊन सन्मानित करण्याची प्रथा होती. हा मुकुट विजयाबरोबरच शांतता आणि उच्च सन्मानाचे प्रतीक मानला जात असे. हीच परंपरा जपताना, आजच्या काळात निसर्गाचा आदर करणाऱ्या आणि शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्यांना हा 'ऑलिव्ह क्राउन' प्रदान केला जातो. इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनच्या (IAA) इंडिया चॅप्टरतर्फे या विशेष पुरस्कारांचे आयोजन करण्यात येते.
या पुरस्कारांचा मुख्य उद्देश समाजात पर्यावरणाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे हा आहे. केवळ जाहिरातींपुरते मर्यादित न राहता, पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या मोहिमांना प्रोत्साहन देणे आणि जे उद्योग किंवा व्यक्ती शाश्वत विकासासाठी खरोखर प्रयत्नशील आहेत, त्यांच्या कार्याची दखल घेणे हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. या उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त उद्योगांनी निसर्गपूरक कार्यपद्धतीचा अवलंब करावा आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, अशी प्रेरणा या पुरस्कारांच्या माध्यमातून दिली जाते.
"संवाद हे केवळ माहिती देण्याचे साधन नसून ते सकारात्मक बदलाचे प्रभावी शस्त्र आहे," असा दृढ विश्वास बाळगणारे जाहिरात क्षेत्रातील दिग्गज रमेश नारायण यांनी १५ वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं. आपण ज्या वसुंधरेवर राहतो त्याच आपल्या धरतीमाता पृथ्वीलाच एक 'ब्रँड' मानून, तिच्या संवर्धनासाठी जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे हे स्वप्न होते. याच स्वप्नातून 'इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन'च्या (IAA) भारतीय शाखेच्या माध्यमातून 'ऑलिव्ह क्राउन पुरस्कार' ही संकल्पना साकारली गेली. प्रभावी संवादाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या आणि शाश्वततेचा विचार करणाऱ्या उद्योजकांना सन्मानित करणारा हा आशियातील पहिला आणि एकमेव पुरस्कार आहे.