मुंबई: प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, तर खासदार सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत, अशी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षातील अंतर्गत वाद आणि संघटनात्मक बदलांच्या चर्चांना शनिवारी अधिकृत उत्तर देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात कोणतेही मोठे बदल झाले नसल्याचा दावा केला. ही पत्रकार परिषद पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आली आहे, असेही आदिक आणि पाटील यांनी स्पष्ट केले.
आदिक म्हणाले, अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना मी पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहात होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे काही काळ दिल्ली कार्यालयात जाणे झाले नाही. मात्र, दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासाठी वेगळे दालन कधीच नव्हते. पूर्वी जेथे बसायचे, आजही हे नेते तेथेच बसतील. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे पक्ष आणि नेत्यांची बदनामी होत असून याप्रकरणी कायदेशीर कारवाईचा विचार केला जाईल.
उमेश पाटील यांनीही पक्षातील नेतृत्वाबाबत कोणताही बदल झालेला नसल्याचे स्पष्ट केले. प्रफुल्ल पटेल आजही राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत आणि सुनील तटकरे हेच प्रदेशाध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेली यादी तात्पुरती होती. घाईगडबडीत वकिलाला पत्र द्यायचे असल्याने ती पाठवण्यात आली.
पक्षातील सर्व अधिकार वर्किंग कमिटीकडे आहेत. या कमिटीची लवकरच बैठक होणार असून त्यात सर्व विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जातील. तसेच सर्व अधिकार हे सुनेत्रा पवार यांच्याकडेच आहेत.
महायुतीतील समन्वयाच्या मुद्द्यावर उमेश पाटील यांनी आनंद परांजपे यांच्या पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त केली. महायुतीमध्ये एकमेकांचे पक्ष फोडायचे नाहीत, असे ठरले असतानाही परांजपे यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. आता परांजपे यांनी आहे तेथे सुखी राहावे, असा टोला त्यांनी लगावला.