मुंबई : महायुतीमधील मुख्य घटक पक्ष असलेल्या भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आपल्या निवडक उमेदवारांना ए-बी फॉर्मचे वाटप केल्याची चर्चा आहे. यात या पक्षाचे मंत्री आणि विद्यमान आमदार यांचा समावेश आहे. (Maharashtra Assembly Polls | Ajit Pawar)
महायुतीच्या जागावाटपाच्या बैठका सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतील याविषयी तर्कवितर्क बांधले जात होते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातून अधिकाधिक जागा मिळाव्यात, यासाठी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी रणनीती आखली होती. पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित ठिकाणासह राष्ट्रवादी काँग्रेसला किमान 75 जागा मिळण्यासाठी प्रत्येक बैठकांमध्ये आग्रह धरण्यात आला होता. तथापि, भाजपने आपली पहिली जम्बो यादी जाहीर केल्यामुळे शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिक जागांच्या इच्छेला मुरड घातली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला किमान 65 जागा मिळाव्यात, अशी रविवारपर्यंत गळ घातली होती. मात्र-भाजपकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने आता तुटेपर्यंत न ताणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पक्षाला महायुतीकडून 55 ते 60 जागा दिल्या जाणार असल्याचे चित्र आहे. (Maharashtra Assembly Polls | Ajit Pawar)
पश्चिम महाराष्ट्राखालोखाल पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कोकणात 12 ते 15 जागांसाठी तटकरे यांनी भाजपकडे आग्रह धरला होता. या भागात भाजपही आपली ताकद वाढवत आहे. त्यामुळे कोकणात राष्ट्रवादीला 10 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात मुंबईतील चार जागांचा समावेश आहे. मुंबईत नवाब मलिक (मानखुर्द), सना नवाब मलिक (अणुशक्तीनगर), झिशान सिद्दीकी (वांद्रे) यांची उमेदवारी निश्चित आहे. नरेंद्र वर्मा यांनीही उमेदवारी मिळण्यासाठी ताकद लावली आहे. मुंबादेवीमधून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही असल्याची चर्चा आहे. (Maharashtra Assembly Polls | Ajit Pawar)