पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील अनेक मतदासंघामध्ये मतदारांच्या यादील फेरफार करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मतदारयाद्यांमधून नावे वगळण्याचे काम झाले आहे. हे सर्व भाजपाच्या सांगण्यावरुन निवडूणक आयोग करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल व शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी आज (दि.१९) माध्यमांशी संवाद साधताना केला.
या वेळी संजय राऊत म्हणाले, " हे भाजपाचे षडयंत्र आहे. आम्ही ते उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. जनतेमध्ये जाऊन या बाबत लोकांना माहिती देऊ. प्रत्येकाला आपले नाव मतदार यादीत आहे याची खात्री करण्यास सांगणार आहे. तसेच मतदारांचा भव्य मोर्चा आम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर काढू."
यावेळी नाना पटोले म्हणाले, "मतदारयाद्यातून नाव वगळण्याचे पाप भाजपाने केले आहे. निवडणूक आयोगाच्या कामामध्ये पारदर्शकता नाही. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम भाजपा करत आहे. हे राज्य फुले, शाहू, आंबेडकरांचे आहे. त्यामुळे तातडीने हे पाप थांबवा. आपल्या मताचा टक्का वाढवण्यासाठी दलित, मुस्लिम मते यादीतून वगळण्यात आली आहेत. फक्त शिर्डी मतदारसंघात २८४४ मते यादीतून गायब आहेत. आम्ही सध्या यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे निवेदन देणार असून लवकरच मोर्चा काढणार आहे."