मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाची फेरबांधणी लवकरच केली जाणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी यासंदर्भात एकत्रित चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
संसद अधिवेशनानंतर या संदर्भातील मॅरेथॉन बैठक होणार आहे असे समजते. निवडणूक रचनाकार प्रशांत किशोर यांनी पक्षविस्तारासाठी पूर्णवेळ अध्यक्ष नेमावा असा प्रस्ताव ठेवला आहे.
किशोर यांच्याशी झालेली भेट केवळ कौटुंबिक स्वरूपाची होती की चार तास चाललेल्या गप्पांच्या ओघात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रगतीसाठी पूर्ण वेळ पक्षाला देऊ शकणारा नेता प्रदेशाध्यक्ष नेमा असे सुचवले? याबद्दल चर्चा रंगल्या होत्या. भाजपला ही भेट नाराज करणारी होती असेही म्हंटले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीशी अंतर्गत नाराजीही होती. मात्र आता सर्व नेत्यांनी एकत्र येऊन पक्षविस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही महिन्यांपासून भाजपच्या विरोधात उभे ठाकलेले प्रशांत किशोर हे सातत्याने पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांची भेट घेतात याबद्दल काही नेते नाराज होते. मात्र ते अजित पवार कुटुंबाचे कौटुंबिक मित्र आहेत आणि अजित पवार हयात असताना ते त्यांच्याशीही गप्पा मारायला येत असत अशी भूमिका पार्थ समर्थकांनी घेतली होती .
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जर भाजपशी सुत जुळले तर हाती काही पर्याय असावा असा विचार अजित पवार गटातील काही मंडळींमध्ये सुरु झाला आहे. नुकत्याच झालेल्या प्रशांत किशोर यांच्या समवेतच्या बैठकीला पवार कुटुंबा व्यतिरिक्त पक्षाचे दोन नेते उपस्थित होते असेही सांगण्यात येते आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बदला असे सांगितले गेल्याचीही चर्चा होती .
पक्षविस्तार का र्यक्रमाची वाच्यता न करणे,बोलणे टाळणे उचित ठरेल असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास सर्व नेत्यांनी संयुक्तरीत्या ठरवले आहे.मराठा समाजात अजित पवार यांच्या नेतृत्वाला मोठे पाठबळ मिळत असे. तोच धागा पुढे नेत या समाजाला ओबीसी मतांची जोड देणे आवश्यक ठरेल असेही सुचवले गेले आहे.
बेरजेचे राजकारण हवे
पक्षाला पूर्ण वेळ देणारा आमदार आणि खासदार नसलेला एखादा तरुण नेता नेमवा, ओबीसी नेता या जबाबदारीला न्याय देऊ शकेल का याचाही विचार व्हावा असे किशोर यांनी सुचवले आहे. पक्षाचे कार्य पद नसलेला नेता राज्यभर वाढवू शकेल असा सल्ला दिला गेला आहे महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांची पाहणी करत त्यानुसार पक्षाने बेरजेचे राजकारण तयार करायला हवे असेही ठरले आहे. यावर चर्चा होईल. दिलीप वळसे पाटील यांचीही यात महत्वाची भूमिका असेल.