Navi Mumbai Bakeries Pudhari
मुंबई

Navi Mumbai Bakeries: आखाती युद्धामुळे नवी मुंबईत बेकरी व्यवसाय दुहेरी संकटात

बेकरीतील पाव, बन, ब्रेड आणि इतर पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय युद्धपरिस्थितीचे पडसाद आता थेट नवी मुंबईतील बेकरी व्यवसायावर उमटू लागले आहेत. एका बाजूला गॅस सिलिंडरचा तुटवडा, तर दुसऱ्या बाजूला कच्च्या मालाच्या वाढत्या किमती यामुळे बेकरी व्यावसायिक दुहेरी संकटात सापडले आहेत. परिणामी बेकरीतील पाव, बन, ब्रेड आणि इतर पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक बेकरींमधील उत्पादन जवळपास 50 टक्क्यांनी घटले आहे. पूर्वी दररोज 150 ते 200 लादी पाव तयार करणाऱ्या बेकरींना आता केवळ 100 लादींपर्यंत उत्पादन मर्यादित ठेवावे लागत आहे.

याचवेळी मैदा, साखर, बटर, खाद्यतेल आणि इंधन यांसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. साखरेच्या 50 किलो पोत्यामागे सुमारे 100 रुपयांची वाढ झाली असून खाद्यतेलातही 15 किलोच्या डब्यामागे 200 ते 250 रुपयांनी वाढ झाली आहे.

काही बेकरी व्यावसायिकांनी पर्याय म्हणून इलेक्ट्रिक भट्ट्यांचा वापर सुरू करण्याचा विचार केला असला, तरी त्यासाठी लागणारा मोठा खर्च लहान व्यावसायिकांसाठी अडथळा ठरत आहे.

इलेक्ट्रिक भट्ट्यांचा पर्याय असला तरी त्यासाठी लागणारा खर्च परवडणारा नाही. आम्ही सध्या ग्राहकांवर जास्त भार टाकू नये म्हणून दरवाढ टाळत आहोत, मात्र ही परिस्थिती कायम राहिल्यास बेकरी पदार्थांच्या किमती वाढविणे अपरिहार्य होईल. शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे.
अखलेश कुमार, प्रतिनिधी, बेकरी असोसिएशन, नवी मुंबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT