मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी आणि पर्यावरणपूरक जलवाहतुकीचे सध्या 125 कि.मी.चे जाळे आहे. या जलमार्गाचे जाळे 340 कि.मी.पर्यंत वाढवण्यात येईल. तसेच 11 नवीन जलमार्गांवर 24 टर्मिनल उभारण्यात येतील. त्यामुळे सध्या 1 कोटी 60 लाख असलेली जलमार्गावरील प्रवासी संख्या 2031 पर्यंत 7 कोटी 39 लाखांपर्यंत जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. जलवाहतुकीबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. विद्यमान 21 जलमार्गांवरील 20 टर्मिनल्सचे आधुनिकीकरण, तर 11 नवीन जलमार्गांवर 24 नवीन टर्मिनल्सच्या उभारणीसाठी 6600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अलिबाग-मांडवासह अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवासी बोटींसाठी मुंबईतील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टी डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.
लॉजिस्टिक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्र निर्माण करणार आहे. वाढवण बंदरामुळे 12 लाखांहून अधिक रोजगार, मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर, आसपासच्या 44 गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करण्यात येणार आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती धोरण जाहीर केले आहे . त्या अंतर्गत मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करण्यात येईल.