मुंबई : मुंबईतील पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा होण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत शहरातील पाणीटंचाईची समस्या दूर होणे अशक्य असल्याचे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरातील पाणीटंचाईवरून महापालिका सभागृहात नगरसेवकांमार्फत केली जाणारी चर्चा व्यर्थ असल्याचे स्पष्ट होते.
मुंबई शहरातील पाणीटंचाईवरून नेहमीच महापालिका सभागृहासह विविध समित्यांमध्ये नगरसेवक आवाज उठवतात. पण चर्चा करूनही पाणीटंचाईचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे ही चर्चा कशाला, असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जातो. नगरसेवकांनी कितीही चर्चा केली अथवा आवाज उठवला तरी जोपर्यंत नवीन जलवाहिन्या टाकण्यासह जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती थांबेपर्यंत पाणीटंचाईची समस्या सुटणार नसल्याचे महापालिकेच्या जल अभियंता विभागातील वरिष्ठ अभियंत्यांचे म्हणणे आहे. सध्या मुंबई शहर व उपनगरात नवीन जलवाहिन्या टाकण्यासह जुन्या जलवाहिन्या बदलून तेथे नवीन जलवाहिन्या टाकणे तर काही ठिकाणी जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्याचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आला आहे.
जलवाहिन्या फुटण्याचे प्रमाण वाढल्याने जल बोगदेही बांधले जात आहेत. ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच मुंबईतील पाणीटंचाई दूर होईल, असे महापालिकेच्या जल अभियंता विभागाचे म्हणणे आहे. जुन्या जलवाहिन्यांमुळे पाण्याचा दाब वाढवणे शक्य होत नाही. परिणामी, प्रत्येकाला मुबलक पाणी मिळत नाही. पाण्याचा दाब वाढवण्याचा प्रयत्न केल्यास जलवाहिनी फुटण्याची शक्यता असते, असेही महापालिकेकडून सांगण्यात आले. नवीन जलवाहिनी टाकल्यानंतर पाण्याचा दाब वाढवणे शक्य होणार आहे. परिणामी, अगदी शेवटच्या घरापर्यंत त्याच दाबाने पाणीपुरवठा होईल, असा दावाही महापालिकेकडून करण्यात येत आहे.
लाखो लिटर पाण्याची बचत होणार
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फुटण्यासह त्यामधून होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे रोज सरासरी 300 ते 350 दशलक्ष लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे शहराला रोज 3950 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होऊनही पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. पण नवीन जलवाहिन्या टाकल्यानंतर पाण्याची मोठी बचत होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
या जलबोगद्यांची कामे सुरू
हेगडेवार उद्यान अमर महल ते प्रतीक्षा नगर वडाळा आणि पुढे सदाकांत ढवन उद्यान परेल 9.7 किमी बोगदा
हेगडेवार उद्यान अमर महलपासून ट्रॉम्बे निम्नस्तर जलाशय आणि पुढे ट्रॉम्बे उच्च स्तर जलाशयापर्यंत बोगदा 5.50 किमी
येवई महासंतुलन जलाशय ते कशेळी जल बोगद्याचा आराखडा तयार
कशेळी ते मुलुंडपर्यंत जल बोगद्याचे बांधकाम सुरू