मुंबई : राजेश सावंत
यंदा पाऊस कमी असल्याने उन्हाळ्यात उद्भवणारी पाणीटंचाई टाळायची असेल तर विहिरींच्या पाण्याचा वापर करण्यापलीकडे पर्याय उरलेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेला पुन्हा विहिरींच्या सफाईचा साक्षात्कार झाला आहे. लवकरच शहर व उपनगरातील विहिरींची सफाई करून पिण्याव्यतिरिक्त कामासाठी त्याचे पाणी वापरात आणण्यात येणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा ९५ टक्के पर्यंत पोहचला आहे. पण ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत पाऊस फारसा झाला नसल्यामुळे सप्टेंबर अखेरपर्यंत तलाव १०० टक्के पाण्याने भरलेली राहतील, हे सांगता येत नाही. जर सप्टेंबरपर्यंत तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा नसेल तर उन्हाळ्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासू शकते. यामुळे उद्भवणारी पाणीबाणी टाळण्यासाठी महापालिकेने आतापासूनच अन्य पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.
सध्या अस्तित्वात विहिरींची साफसफाई करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापरण्याचे नियोजन आहे. यासाठी सध्या विहिरींची सफाई करण्यात येणार आहे. विभाग कार्यालय मार्फत विहिरींचा शोध घेऊन त्यातील गाळ उपसण्यासह अंतर्गत झरे मोकळे करून देण्यात येणार आहेत. यातील काही विहिरींचा आजही वापर होत असून हे पाणी इमारत बांधकामधारकांना पुरवण्यात येते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी जूनमध्ये सुरू होणारा मान्सून लांबल्याने विहिरींची अद्ययावत माहिती सर्व प्रशासकीय विभागांंच्या सहायक आयुक्तांनी संकलित करावी. अस्तित्वात विहिरी वापरात येतील का, याची खात्री करावी.नगरसेवक, गृहनिर्माण संस्था यांच्याशी समन्वय साधून विहिरींचे पाणी वापरात आणण्याचे, निर्देश दिले होते. परंतु पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने हा निर्देश कागदावरच राहिला. परंतु अद्यापपर्यंत तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा न झाल्याने आयुक्तांच्या निर्देशाची अधिकाऱ्यांना पुन्हा आठवण झाली आहे.
बोरवेलचाही घेणार शोध
मुंबई शहर व उपनगरात काही वर्षांपूर्वी नगरसेवक निधीतून बोरवेल खोदण्यात आल्या होत्या. परंतु कालांतराने या बोरवेलचा वापर न झाल्यामुळे यातील अनेक बोरवेल बंद आहेत. तर काही बोरवेलचे पाणी टँकर लॉबीमार्फत वापरण्यात येत आहे. त्यामुळे बोरवेलचाही शोध घेऊन ते पाणी वापरता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात येणार आहे.
विहिरींची संख्या - ३,६५०
शहर - १,८५०
पूर्व उपनगर - ३५०
पश्चिम उपनगर - १,४५०