मुंबई: मुंबईत आधीच १० टक्के पाणीकपात सुरु असताना आता पांजरापूर येथील मुंबई - ३ अ उदंचन केंद्रातील विद्यमान ६.६ के.व्ही. उच्च दाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे.
यामुळे मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून ते बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंतच्या २० तासांच्या कालावधीत भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पांजरापूर येथून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही भागास पाणीपुरवठ्यात १५% कपात करण्यात आली आहे.
पांजरापूर येथील मुंबई - ३ अ उदंचन केंद्रातील ६.६ के.व्ही. उच्चदाब नियंत्रण पॅनेल बदलण्याचे नियोजन आहे. या अंतर्गत विद्यमान १० जुन्या उच्चदाब नियंत्रण पॅनेलच्या जागी अत्याधुनिक व कार्यक्षम अशा १० नवीन उच्च दाब नियंत्रण पॅनेलची स्थापना करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्या अंतर्गत एकूण १० उच्चदाब कंट्रोल पॅनलपैकी ४ उच्चदाब कंट्रोल पॅनल प्रथम बदलण्यात येणार आहेत. हे काम मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून ते बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही पूर्ण करण्यासाठी ‘मुंबई ३ अ उदंचन केंद्र’ सुमारे २० तास बंद ठेवणे अपरिहार्य आहे.