

मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) निकालाबाबत समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या दोन व्हिडीओंमुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने आझाद मैदान पोलीस ठाणे तसेच राज्य सायबर पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
संबंधित व्हिडीओंतील दाव्यांची सत्यता पडताळून आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सीईटी कक्षाने केली आहे. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या या व्हिडीओंमध्ये एमएचटी-सीईटी परीक्षेची पारदर्शकता, विश्वासार्हता आणि परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
तसेच बारावीच्या पीसीएम गटातील गुण आणि एमएचटी-सीईटी तसेच जेईई परीक्षेतील पर्सेंटाइल यांची तुलना करत, तुलनेने कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये ९९ ते १०० पर्सेंटाइल कसे मिळाले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सीईटीमध्ये उच्च पर्सेंटाइल मिळवूनही सामाईक प्रवेश प्रक्रिया (कॅप)मध्ये अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीचाही या व्हिडीओंमध्ये उल्लेख आहे.
१०० पर्सेंटाइल मिळालेल्या ३८ विद्यार्थ्यांपैकी ३६ जण गुणवत्ता यादीत असून उर्वरित दोघांनी कॅप प्रक्रियेसाठी अर्जच केला नव्हता. त्यामुळे निवडक उदाहरणांच्या आधारे संपूर्ण निकाल प्रक्रियेवर संशय घेणे योग्य नसल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट केले.
बारावीचे गुण आणि सीईटीचे पर्सेंटाइल यांचा थेट संबंध जोडणेही योग्य नसल्याचे सीईटी कक्षाने म्हटले आहे. आकडेवारीनुसार, बारावीत पीसीएम गटात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या ३४४ विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये ४० पर्सेंटाइलपेक्षा कमी गुण मिळाले.