Mumbai Water Cut (Pudhari File Photo)
मुंबई

Mumbai Water Cut: 15 मेपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात

यंदा पावसाचे प्रमाण आणि बाष्पीभवन होत असल्याने सद्यस्थितीत या धरणांमध्ये केवळ 27 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली असतानाच पाणीटंचाईचे संकट ओढवण्यापूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने येत्या 15 मे पासून संपूर्ण मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण आणि बाष्पीभवन होत असल्याने सद्यस्थितीत या धरणांमध्ये केवळ 27 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

पावसाळा सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवून वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. 15 मे पासून ही कपात लागू होणार असल्याने इमारतींमधील टाक्या भरताना किंवा दैनंदिन वापरावेळी मुंबईकरांना नियोजित कपातीचा सामना करावा लागणार असल्याचे अश्विनी भिडे म्हणाल्या.

मुंबईची तहान भागवण्यासाठी पालिकेने राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भातसा आणि वैतरणा धरणांतील राखीव साठ्यातून 237 दशलक्ष लिटर पाणी मिळावे, अशी विनंती केली आहे. या संदर्भात पालिकेने सरकारला अधिकृत पत्र पाठवले असून, हा राखीव साठा उपलब्ध झाल्यास मुंबईकरांना पाणीकपातीपासून काहीसा दिलासा मिळू शकतो याकडेही त्यांनी लक्षवेधले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT